ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर वृक्षारोपण हाच प्रभावी उपाय - बाळासाहेब थोरात
◻️ जागतिक पर्यावरण दिनी कारखाना कार्यक्षेत्रात १०१ आंबा वृक्षांचे रोपण
संगमनेर LIVE | “ग्लोबल वॉर्मिंगमुळे वाढलेले पृथ्वीचे तापमान, अनियमित पाऊस आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही मानवासमोरची सर्वात मोठी आव्हाने आहेत. या संकटावर मात करण्यासाठी केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना’ येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रात १०१ आंबा वृक्षांचे रोपण केले. यावेळी थोरात यांनी कारखान्यातील वृक्षारोपण मोहिमेचे कौतुक करत दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून तालुक्यात निर्माण झालेल्या ‘वृक्ष संवर्धन संस्कृती’चा आढावा घेतला.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, “सहकारी संस्थांनी डोंगराळ भागात केलेली वृक्षलागवड ही पर्यावरणासाठी संजीवनी ठरत आहे. येणाऱ्या पावसाळ्यात प्रत्येक नागरिकाने किमान दोन झाडे लावून ती जगवण्याचा संकल्प करावा.” असे आवाहन केले.
यावेळी डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी वृक्षारोपणाची जी मुहूर्तमेढ रोवली, तिचे रूपांतर आता एका जनआंदोलनात झाले आहे. हे केवळ काम नसून ते एक व्रत आहे. तालुक्यात निर्माण होत असलेली हिरवाई ही भविष्यासाठी महत्त्वाची गुंतवणूक आहे.” असे नमूद केले.
दरम्यान, याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग घुले यांनी केले, तर दशरथ वर्पे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कारखान्याचे पदाधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.