पद्मश्रीचे सहकार व शैक्षणिक कार्य आजही समाजासाठी दिशादर्शक - भारत गिते
◻️ पिंप्री-लौकी अजमपूर येथे १२६ व्या जयंतीनिमित्त पद्मश्री डॉ. विखे पाटलांना अभिवादन
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात केलेले उत्तुंग कार्य आजही समाजाच्या हिताचे आणि दिशादर्शक आहे. त्यांनी आशिया खंडात उभी केलेली सहकारी साखर कारखान्याची चळवळ खऱ्या अर्थाने सहकाराला दिशा देणारी ठरली असून, यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि दीनदुबळ्यांना मोठा फायदा झाला आहे, असे प्रतिपादन जनसेवा मंडळाचे अध्यक्ष भारत गीते यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पिंप्री-लौकी अजमपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुंढे होते. तर व्यासपीठावर भाऊसाहेब लावरे, रामदास दातीर, भिमराज गीते, रमेश गीते, बाळासाहेब गीते आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र बोंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना भारत गीते म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात अशिक्षित लोकांमध्ये सहकाराची बिजे रोवणे सोपे नव्हते. मात्र, प्रचंड त्रास सहन करत पद्मश्री विखे पाटलांनी डॉ. धनंजयराव गाडगीळ यांच्या साथीने खेडोपाडी फिरून शेअर्स गोळा केले आणि प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना उभारून एक मूर्तिमंत उदाहरण जगासमोर ठेवले. या कारखान्यामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि असंख्य तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला.
केवळ सहकारच नाही तर, ग्रामीण भागातील मुला-मुलींना उच्च शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी त्यांनी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे'ची आणि आरोग्याच्या सुविधांसाठी प्रवरा मेडिकल ट्रस्ट'ची उभारणी केली. तसेच, ग्रामीण जनतेची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी 'प्रवरा बॅके'ची स्थापना करून तरुणांना व शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले.
पद्मश्रींचा हाच वसा आणि वारसा माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी अखंडपणे पुढे चालवला. आजही राज्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांचे राहिलेले कार्य सक्षमपणे पुढे नेत असून, त्यांना जनतेचे मोठे पाठबळ मिळत असल्याचेही गीते यांनी यावेळी नमूद केले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक पाटोळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक राजेंद्र बोंद्रे यांनी मानले. या जयंती सोहळ्याला परिसरातील नागरिक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.