डोळासणेवासीयांची वीज जोडणीची चाळीस वर्षाची प्रतीक्षा संपली!
◻️ आमदार अमोल खताळ यांनी अवघ्या वर्षभरात मिळवून दिला १० लाखांचा निधी
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | संगमनेर तालुक्यातील पठार भागातील डोळासणे परिसरातील नागरिकांचा निवासी वीज जोडणीचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामासाठी तब्बल १० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाल्याने डोळासणेवासीयांची वीज जोडणीची चाळीस वर्षाची प्रतीक्षा संपल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
डोळासणे परिसरातील अनेक कुटुंबांना निवासी वीज जोडणी नसल्याने मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत होते. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या प्रश्नाची आमदार अमोल खताळ यांनी तातडीने गंभीर दखल घेतली आणि शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरू केला. त्यांच्या या प्रयत्नांना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भक्कम साथ मिळाली.
पालकमंत्र्यांच्या सहकार्यातून जिल्हा वार्षिक योजना (सन २०२५-२६) अंतर्गत ओटीएसपी योजनेतून या निवासी वीज जोडणीच्या कामांसाठी १० लाख १ हजार ७९७ रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा निधी केवळ कागदावरच न राहता त्यातून संबंधित कामांना प्रत्यक्ष सुरुवातही झाली आहे.
आमदार अमोल खताळ यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवघ्या एका वर्षाच्या अल्पावधीतच नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न सोडवून दाखवल्याने त्यांच्या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, “आमदार अमोल खताळ पाटील यांनी आमदारकीच्या अवघ्या एका वर्षात आमच्या या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. नुसता निधी मंजूर करून न थांबता त्यांनी प्रत्यक्ष काम सुरू केले आहे. वीज जोडणीसारखा नागरिकांच्या जीवनातील अंधार दूर करणारा प्रश्न मार्गी लागल्याने डोळासणे परिसरातील सर्व नागरिक आमदार खताळ यांचे आभारी आहेत.” अशी प्रतिक्रिया डोळासणे येथील राहुल मुके यांनी दिली.