एआय तंत्रज्ञान वापरून ऊस शेती परवडणारी करा - बाळासाहेब थोरात
◻️ खांडगाव येथे ’ऊस विकास मेळावा’ उत्साहात संपन्न
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “ऊस आणि दूध ही शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन देणारी मुख्य साधने आहेत. मात्र, वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेती फायदेशीर करायची असल्यास एकरी उत्पादकता वाढवणे काळाची गरज आहे. नवीन कृत्रिम बुध्दिमत्ता (एआय) तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आणि आधुनिक पध्दतींचा वापर करून शेतकऱ्यांनी कमी श्रमात दर्जेदार व जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे,” असे आवाहन काॅग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने खांडगाव येथील ‘खांडेश्वर ऊस बेणे मळ्या'वर आयोजित 'कृत्रिम बुध्दिमत्ता व ऊस शेती' तसेच ‘ऊस विकास मेळाव्यात’ ते बोलत होते.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, “दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालव्यांचे काम आपण पूर्ण केले असून, आता दोन्ही कालव्यांना पाणी आले आहे. या पाण्याचा सुनियोजित वापर करून कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र वाढविले पाहिजे. ‘कमी श्रमात जास्त उत्पादन’ हे सूत्र स्वीकारून शेतकऱ्यांनी शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. एआय प्रणालीमुळे पिकांवरील रोग, किडींचा प्रादुर्भाव आणि उपाययोजना याविषयी वेळेत अचूक माहिती उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान टळेल.”
केंद्र सरकारच्या साखर धोरणावर टीका करताना थोरात म्हणाले की, “केंद्राने सुरुवातीला कारखान्यांना इथेनॉल निर्मिती करण्यास सांगितले, मात्र आता ते खरेदी करताना हात आखडता घेत आहेत. आधी देशातील साखर निर्यात करायची आणि नंतर १० लाख टन साखर आयात करायची, असा केंद्राचा धोरणात्मक गोंधळ सुरू आहे. या चुकीच्या निर्णयांचा फटका सर्वसामान्य नागरिक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.”
कारखान्याच्या कार्यपध्दतीविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, “कोणत्याही शेतकऱ्याने ऊस लागवड करण्यापूर्वी तीन महिने अगोदर कारखान्याकडे नोंद केल्यास त्यांच्या जमिनीचे 'आरोग्य कार्ड' तयार केले जाते. कार्यक्षेत्रात उत्पादन वाढल्यास कारखान्याचे गाळप वाढेल; परिणामी उपपदार्थ, इथेनॉल आणि सहवीज निर्मितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उसाला अधिक चांगला दर देणे शक्य होईल.”
याप्रसंगी मार्गदर्शन करताना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग यांनी जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब वाढवण्यावर भर दिला. यासाठी शेतकऱ्यांनी पाचट न जाळता त्याचा सेंद्रिय खत म्हणून शेतात पुनर्वापर करावा, पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि नियमित माती परीक्षण करून खतांचे नियोजन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. याचबरोबर, एआय तंत्रज्ञानामुळे तापमान, हवेतील आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि हवामानाचा अचूक अंदाज शेतकऱ्यांना सहज समजत असल्याने पिकांचे संभाव्य नुकसान टाळून योग्य नियोजन करणे शक्य होते, असे प्रतिपादन नितीन शिंदे यांनी केले.
दरम्यान, याप्रसंगी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थोरात साखर कारखाना आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस विकास वाढीसाठी २५ प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांच्या शेतावर दररोज हवामानातील बदल, संभाव्य कीड-रोगांचा धोका आणि पाण्याची उपलब्धता यांचे तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. या प्रयोगशील गटाच्या यशामुळे तालुक्यातील इतर शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.