◻ रामदास आंधळे यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक निमगावजाळी रस्त्यावरील प्रतापपूर शिवारातील रामदास लक्ष्मण आंधळे यांच्या वस्तीवर सोमवारी मध्यरात्री बिबट्याने हल्ला करुन तीन शेळ्या ठार केल्याची घटना घडली आहे.
प्रतापपूर शिवारातील मानमोडे बाबा मंदिरा लगत असलेल्या गट नंबर ३०३ मध्ये रामदास लक्ष्मण आंधळे यांची वस्ती व शेळ्याचा गोठा आहे. सोमवारी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास शेळ्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने आंधळे यानी गोठ्याकडे धाव घेतली असता तीन शेळ्या या मृतावस्थेत आढळून आल्या. आंधळे यांचा शेळ्याचा गोठा हा लोखंडी जाळीने बंदिस्त केलेला असून छोट्याशा जागेतून बिबट्याने आतमध्ये प्रवेश करुन त्याच्या तीन शेळ्या ठार केल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
त्यामुळे आंधळे यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. तर वनविभागाने आंधळे यांना तात्काळ अर्थिक मदत द्यावी व या ठिकाणी पिजंरा लावुन बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.