◻ नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या कुटुंबियांना शासन मदतीच्या धनादेशाचे आ. विखे पाटील यांच्या हस्ते वितरण.
संगमनेर Live | नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनाही शासन मदतीचा लाभ मिळाला पाहीजे आशी अपेक्षा व्यक्त करतानाच हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेतील निकषांच्या बदलासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही भाजपाचे जेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
नैसर्गिक आपत्तीमुळे नूकसान झालेल्या कुटुंबियांना शासन मदतीच्या धनादेशाचे वितरण आ. विखे पाटील यांच्या हस्ते संगमनेर तालुक्यातील कनोली येथे करण्यात आले. ज्ञानदेव वर्पे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास विभागाचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम, जेष्ठ नेते रघूनाथ शिंदे, एकनाथ नागरे, रामभाऊ भुसाळ, कैलास तांबे, निवृती सांगळे, रखमाजी खेमनर, भागवतराव उंबरकर, शांताराम शिंदे, गोकुळ दिघे आदी उपस्थित होते. नैसर्गिक आपत्तीने दगावलेली जनावरे, पडलेली घरे आणि पुरामुळे नुकसान पोहचलेल्या शेती क्षेत्रासाठी २८४ लाभार्थ्याना एकुण २३ लाख रुपयांची मदत जाहीर झाली असून, प्रातिनिधीक स्वरुपात या मदतीचे धनादेश वितरीत करण्यात आले.
आपल्या भाषणात आ. विखे पाटील म्हणाले की, हवामानातील बदलाचा होत असलेला परिणाम आता स्विकारावाच लागेल. नैसर्गिक आपत्तीने किंवा अतिवृष्टीने होणाऱ्या नुकसानीला शासनाची मदत पुरेल अशीही परिस्थिती नाही. यासाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना चांगल्या पध्दतीने आमलात आणणे हेच उत्तर आहे. या योजनेतील निकष शासनाने बदलल्याने बहुतांशी शेतकरी शासकीय मदतीपासुन वंचित राहत आहेत. फळबागांच्या संदर्भातही या योजनेच्या मदतीचे सरकारचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळेच हवामानावर आधारित पिक विमा योजनेतील बदलांबाबतच्या शिफारशी राज्य आणि केंद्र सरकारकडे आपण करणार आहोत.
शेतकऱ्यांना कोणतेही संरक्षण नाही, परंतू जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्यांना संरक्षण देणे हे व्यवस्थेचे कर्तव्यच आहे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, शेतकऱ्यांना मदत ही झालीच पाहीजे. पण शेतकऱ्यांना कोणताही पक्ष नाही असे स्पष्ट करुन आ. विखे पाटील यांनी सांगितले की, आता गावपातळीवरच तरुणांनी एकत्रित येवून कृषि क्षेत्रातील नवीन प्रयोग सुरु केले पाहीजे. दूग्ध व्यवसायातील गुणवत्ता टिकावी म्हणुन योग्य मार्गदर्शन होत नसल्याची खंत व्यक्त करुन, याबाबत शासकीय स्तरावर उदासीनता दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्ती असेल किंवा कोवीडचे संकट असेल सर्वच आधिकाऱ्यांनी चांगल्या पध्दतीने काम केले. योग्य पंचनामे झाल्यामुळेच या मदतीचे धनादेश लाभार्थ्यांना मिळाले. इतर उरलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही तातडीने मदत मिळवी यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी आपल्या भाषणात जाहीर झालेल्या मदतीचा आढावा घेवून या मदतीने दिलासा देण्याची जबाबदारी सरकार पार पाडत असल्याचे सांगितले. करोनाच्या पार्श्वभूमिवर नागरीकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसिलदार अमोल निकम यांनी केले. जेष्ठनेते रखमाजी खेमनर यांचेही याप्रसंगी भाषण झाले.