◻संगमनेर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.
संगमनेर Live | भारतीय समाज सुधारणेत अनेक महापुरुषांचे त्याग सदैव प्रेरणादायी आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीयांसह बहुजनांचे शिक्षण व शिक्षणातून समाज परिवर्तनासाठी केलेले कार्य ऐतिहासिक व क्रांतीकारक असून समाजविकासाचा पाया घातला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
यशोधन संपर्क कार्यालयात संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, जि. प. सदस्य सिताराम राऊत, आर. एम. कातोरे, सुभाष सांगळे, विलास कवडे, किशोर टोकसे, अजय फटांगरे, बाळासाहेब गायकवाड, विक्रम ओहोळ आदि उपस्थित होते.
यावेळी नामदार थोरात म्हणाले कि, सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाचा हक्क, स्त्री भ्रूण हत्या विरोध, बालविवाह विरोध, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना, दीनदलितांना व अनाथांना प्रेम व न्याय मिळवून देण्यासाठी भरीव असे कार्य केले आहे. स्त्रीयांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी खुप मोठा प्रयत्न केला. आज स्त्री पुरुषाच्या बरोबरीने शिक्षण, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात काम करत आहे हे केवळ सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे घडले. सावित्रीबाईंनी सामाजिक न्याय, विषमता नाहिशी होणे आणि आत्मसन्मान जागविण्यासाठी त्यांनी स्त्रीयांना शिक्षणातून पुढे आणले. यावेळी स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा नव्हता अशा वेळी मुलींना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नवसंजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले असल्याचे ही ते म्हणाले.
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, आजच्या युगात स्त्री स्वताच्या पायावर उभी राहु शकते स्व:ताचे निर्णय स्वता घेऊ शकते. अन्यायाविरोधात लढा उभारु शकते हे केवळ क्रांतीयोती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे प्रतिक आहे. देशाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांनी सर्वसमावेशक समाजसेवा करुन एक अपूर्व आणि क्रांतीकारी परंपरा निर्माण केली. त्यांचे स्त्री विषयक कार्य म्हणजे भारतातील स्त्रीयांच्या सार्वजनिक जिवनातील एक युगप्रवर्तक अशीच घटना आहे असे ही त्या म्हणाल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.