शेतकरी संघटनांच्या देशव्यापी ‘ चक्का जाम ’ ला काँग्रेसचा पाठिंबा - ना. बाळासाहेब थोरात.

संगमनेर Live
0
◻ मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे जगात भारताची नाचक्की.

संगमनेर Live | कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर ७० दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांकडे नरेंद्र मोदी सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. शेतकरी आंदोलन चिरडू पाहणाऱ्या मोदी सरकार विरोधात दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने ६ फेब्रुवारी रोजी देशभर तीन तासांच्या चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस पक्षाचा या ‘चक्का जाम’ ला पाठिंबा आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

यासंदर्भात ना. थोरात पुढे म्हणाले की, देशाचा अन्नदाता आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. परंतु केंद्रातील भाजपाचे हुकूमशाही सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. कृषी कायदे हे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत त्यामुळेच ते रद्द करावेत ही मागणी लावून धरत महाराष्ट्रासह देशभर आंदोलन करुन काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला आहे. कृषी कायदे मंजूर करवून घेताना संसदेत चर्चा केली नाही. विरोध तीव्र होत असताना आता मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचे केवळ नाटक करत आहे.

दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने अनन्वीत अत्याचार सुरु केले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना अन्न-पाणी मिळू नये अशी कोंडी मोदी सरकारकडून केली जात आहे. दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून रस्त्यांवर मोठे बॅरिकेड्स लावून तटबंदी उभी केली आहे. रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. मोठा पोलीस फौजफाटा लावून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असून मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभऱ नाचक्की होत आहे, असेही ना. थोरात म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !