संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील सादतपुर येथिल नानासाहेब कोंडाजी मगर (वय - ४५) याचा विहरीत पाय घसरुन पडल्यामुळे पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवार दि. २३ मे रोजी नानासाहेब कोंडाजी मगर हे आपल्या गट नंबर - १७८ मध्ये गेले होते. सायंकाळ झाली तरी ते घरी न आल्यामुळे कुटुंबियानी शोधाशोध सुरु केली असता शेतातील ६० फूट खोल विहीरीत त्याचा मृतदेह आढळून आला असून ते विहिरीत पाय घसरुन पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच आश्वीचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर व त्याचे सहकारी घटनास्थळी हजर झाले होते. रात्री उशीरा रामदास बोरसे व स्थानिक नागरीकाच्या सहकार्याने नानासाहेब मगर याचा मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला होता. यावेळी गावातील संदिप कडलग, पोलीस पाटील सुनिल मगर, संजय मगर आदिसह ग्रामस्थं उपस्थित होते.
दरम्यान नानासाहेब मगर याच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा, तीन मुली, जावई असा मोठा परिवार आहे. त्याच्या दुर्देवी निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून सोमवारी दुपारी त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले आहेत.