संगमनेर Live | राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे राज्य पातळीवर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असताना सुद्धा जिल्ह्यातील व संगमनेर तालुक्यातील कोरोणा वाढ पूर्णपणे थांबवण्यासाठी विविध उपाययोजना करत असून आज तालुक्यातील विविध गावांना भेट देत कोरोना मुक्त गावाचे अभियान राबविण्यासाठी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत विविध सूचना केल्या.
आज निमगाव भोजापूर, जवळे कडलग, चिकणी, राजापूर, गुंजाळवाडी, घुलेवाडी येथे त्यांनी सोशल डिस्टन्स चे पालन करत गावकर्यांशी संवाद साधला. यावेळी समवेत आ. डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यातील काही गावांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढली आहे म्हणून संगमनेर शहरालगत असलेल्या वाढत्या संख्येच्या गावांमध्ये नामदार थोरात व आ. डॉ. तांबे यांनी जाऊन गावकर्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, प्रशासन आपल्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मात्र या कामाला नागरिकांचेही सहकार्य मिळणे अत्यंत गरजेचे आहे. सध्या शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून ग्रामीण भागामध्ये ही संख्या वाढती आहे. त्यामुळे प्रत्येक गावात जनजागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत घरोघर जाऊन नागरिकांची तपासणी करा. कुणाला काही लक्षणे आढळली तर तातडीने विलगीकरण करा. मागील एक वर्षापासून कोरोनाचे संकट आपल्यावर आहे. याबाबत माहिती असूनही अनेक जण निष्काळजीपणा करत आहेत. आजाराची कोणतीही लक्षणे आढळली तर तातडीने जवळचे प्रशासकीय अधिकारी किंवा गावातील पदाधिकार्यांना कल्पना द्या. स्वत:चे विलगीकरण करा. कारण कुटुंबात एकाला बाधा झाली तर संपूर्ण कुटुंब बाधित होते आणि मग त्या कुटुंबावर मोठे संकट येते. या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. घरगुती समारंभ पूर्णपणे टाळा. या संकटात संगमनेर मधील प्रशासन व विविध सहकारी संस्था आणि यशोधन कार्यालय हे आपल्या मदती करता तत्पर आहे. गरज असेल तेथे तातडीने संपर्क करा. कोरोना साखळी तोडणे हे काम प्रत्येकाने राष्ट्रीय कार्य म्हणून हाती घ्या असेही ते म्हणाले
तर आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला कोरोना मुक्त तालुका करायचा आहे. यासाठी प्रत्येकाने अत्यंत जबाबदारीने या काळात राहिले पाहिजे. लक्षणे आढळलेली व्यक्ती बाजूला करून त्यावर उपचार करणे हे सर्वप्रथम गरजेचे आहे. सर्वांचे लसीकरण होईल याबाबत नामदार थोरात हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत .आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की कोरोणा रुग्ण वाढ थांबवणे आणि यासाठी अधिक जागृत राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले
यावेळी प्रत्येक गावातील निवडक पदाधिकारी या बैठकांसाठी उपस्थित होते.