◻ माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांना आवाहन.
संगमनेर Live (लोणी) | कोविड १९ संकटाच्या पार्श्वभूमिवर १५ जुन रोजी वाढदिवसाच्या निमित्ताने कोणतेही कार्यक्रम आयोजित न करण्याचे आवाहन माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी कार्यकर्ते आणि हितचिंतकांना केले आहे.
या सदंर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आ. विखे पाटील यांनी म्हटले आहे की, मागील दिड वर्षापासुन करोनाच्या आपत्तीमुळे सामाजिक जीवन संपुर्णत: भयभित आणि अस्वस्थ आहे, कोरोनाचे संकट थोडेफार कमी झाले असले तरी, या संकटाचा सामना मागील अनेक दिवसांपासुन आपण सर्वजण सामुहीकपणे करीत आहोत.
अद्यापही संकट संपलेले नसून, तिसऱ्या लाटेची भिती आहे. त्यामुळे अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी, संस्थानी कोणत्याही जाहीर कार्यक्रमांचे, सत्काराचे आयोजन करुन हार, बुके आणि फ्लेक्स बोर्डवरील खर्च टाळावा या खर्चाची रक्कम पी. एम. केअर फंडासाठी व कोव्हीड रुग्णांच्या उपचारार्थ जमा करावी असे आवाहन त्यांनी केले आहे.
कोरोना संकटातील दुसऱ्या लॉकडाऊन नंतर गावपातळीवरील जनजीवन हळुहळु पुर्वपदावर येत आहे. कोव्हीड संकटाचे गांभिर्य अद्यापही कमी झालेले नाही. सर्वांनाच शासन नियमांचे पालन करुन, काळजी घेण्याची गरज आहे. मागील काही महिन्यांपासुन रोजगारच बंद असल्याने गरजू, निराधार लोकांना अद्यापही आधार देण्याची गरज असल्याने निराधारांना मदत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.