◻ संगमनेरसह विविध ठिकाणी केद्रं सरकार विरुद्ध निषेध आंदोलन.
संगमनेर Live | मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या भरमसाठ किमती वाढवून देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईच्या खाईत लोटले आहे. याच्या निषेधार्थ राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुक्यात विविध ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले.
संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकी संघ, बोटा, मंगळापुर, निमगावजाळी, तळेगाव दिघे या ठिकाणी पेट्रोल पंपावर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, तालुकाध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, शिवाजीराव थोरात, शंकरराव खेमनर, सौ. सुनंदाताई जोर्वेकर, जिल्हापरिषद सदस्य रामहरी कातोरे, अजय फटांगरे, शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, विजय हिंगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, मोदी सरकार हे भूलथापा देऊन सत्तेवर आलेले सरकार आहे. कोरोनाच्या संकटात मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल सह घरगुती गॅसची भरमसाठ वाढ केलेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अत्यंत कमी असताना नफेखोरीसाठी केंद्र सरकार सामान्यांना वेठीस धरत आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. बेरोजगारी वाढली आहे, सर्वत्र अशांतता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने ठोस निर्णय घेणे ऐवजी केंद्र सरकार मताचे राजकारण करून जनतेमध्ये फुट पाडत आहे. यामुळे देशाची एकात्मता धोक्यात येऊ शकते. लोकशाही टिकवण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रीय झाले पाहिजे.
यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग व श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली याच स्थितीत असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीवेळेस पेट्रोल हे ६० रुपये लिटर होते. आज मात्र शंभर रुपयांच्या पुढे गेले आहे. अच्छे दिनच्या ऐवजी बुरे दिन सुरू झाले आहेत. त्यामुळे गोरगरीब आणि सामान्य माणूस अत्यंत वैतागलेला आहे. या सामान्य माणसाची अस्वस्थता सरकारने जाणून घेऊन तातडीने गोरगरिबांवर लागलेली भाववाढ कमी करावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
इंद्रजीत थोरात म्हणाले की, केंद्र सरकारने अत्यंत जुलमी पद्धतीने ही भाववाढ केली आहे. महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यात व अहमदनगर जिल्ह्यात केंद्र सरकार विरोधात मोठे आंदोलन होत आहे. महागाईमुळे मोठी अस्वस्थता सामान्य माणसांमध्ये निर्माण झाली आहे. या सर्वांना केंद्र सरकार जबाबदार असून कोरोना संकटात धीर देणे ऐवजी अत्यंत कष्टमय जीवन जनतेवर लादले जात असल्याची टीका त्यांनी केली.
याप्रसंगी बाबा ओहोळ, सौ. दुर्गाताई तांबे, अर्चनाताई बालोडे, सुभाष सांगळे, शिवाजीराव थोरात, प्रा. बाबा खरात, अड. अशोक हजारे, रामहरी कातोरे, अजय फटांगरे, सिताराम राऊत, गौरव डोंगरे, सौ सुनिता कांदळकर, सचिन दिघे, विजय हिंगे यांनीही केंद्र सरकारवर टीका केली.
यावेळी तळेगाव येथे सरपंच बाबजी कांदळकर, रावसाहेब दिघे, संगमनेर येथे दत्तू खुळे, जावेद शेख, तात्या कुटे, विजय उदावंत, गबाजी खेमनर, अण्णासाहेब थोरात, सौ. शालन गुंजाळ, निमगावजाळी येथे सोमनाथ जोंधळे, राम तांबे, नितीन कोकणे, दिनकर आंधळे, राजेंद्र चकोर, अनिल डेंगळे, बोटा येथे संतोष शेळके, अरुण वाघ, बाळासाहेब कुराडे, यशवंत कुराडे आदींसह काँग्रेसच्या विविध सेलचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अदोंलनादरम्यान प्रा. बाबा खरात यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विडंबन गीते सादर केली आहेत.