ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करणारी सहकार व्यवस्था जपलीच पाहिजे - ना. थोरात

संगमनेर Live
0

१०० टक्के वसुली देणाऱ्या १६ सेवा सोसायट्यांचा गौरव.

संगमनेर Live | अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याच्या विकासात जिल्हा बँकेचे मोठे योगदान असून यावेळची निवडणूक पक्ष विरहित सर्वाना बरोबर घेत बिनविरोध केली. सहकार चळवळ ही आपल्या सर्वाच्या प्रगतीसाठीची व्यवस्था आहे. ती सर्वांनी निकोपपणे जपली पाहिजे आणि टिकविली पाहिजे असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे गटनेते व राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या संगमनेर शाखेतील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सभागृहात तालुक्‍यातील १०० टक्के वसुली देणाऱ्या १६ सेवा सोसायट्यांचा व ३५ शाखांचा गौरव करण्यात आला यावेळी ते बोलत होते. 

याप्रसंगी सन २०२० – २०२१ या साला मध्ये शंभर टक्के वसुली देणाऱ्या जोर्वे, देवकौठे, वरझडी, निंबाळे, घुलेवाडी, कुंभारवाडी, शिरसगाव धुपे, सांगवी, आनंदवाडी, वरुडी पठार, कौटेवाडी, म्हसवंडी, आंबी दुमाला, बोटा, चिखली, निमगाव भोजापूर या १६ सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांचा ना. थोरात यांनी सन्मान केला तर १०० टक्के वसुली असणाऱ्या बँकेच्या ३५ शाखा अधिकारी यांचाही सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना नामदार थोरात म्हणाले की, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवली. अहमदनगर जिल्ह्यातील जुन्या पिढीतील नेत्यांनी ही चळवळ जीवापाड जपताना या जिल्ह्याचा विकास साधला. जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्याची आर्थिक कामधेनू आहे. शासन आणि सहकार या दोन्हींचाही माध्यमातून जिल्ह्याची आज मोठी प्रगती झाली आहे. सहकार ही व्यवस्था आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी आहे. ती टिकवली पाहिजे आणि निकोप पद्धतीने जपली पाहिजे. बँकेत कधीही राजकारण नको आहे म्हणून आपण पक्षविरहित सर्वांना बरोबर घेत या वेळची निवडणूक बिनविरोध केली. बँकेने आपला लौकिक कायम जपला असून यापुढेही शेतकऱ्यांच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्या.

महाविकास आघाडी सरकारने सहज व सोप्या पद्धतीने दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी केली यातून जिल्हा बँकेला चौदाशे कोटींची कर्जमाफी मिळाली. कोरोना संकट आले. अन्यथा दोन लाखाच्या पुढची ही माफी देता आली असती. परंतु ती नक्की दिली जाणार आहे. सध्या सर्वत्र कोरोनाचा काळ आहे. आगामी दोन महिने अत्यंत काळजीचे आहे. संगमनेर मध्ये कोरोना संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या. कोरोना हा कुणालाही होऊ शकतो. कोणीही भ्रमात राहू नका. काळजी घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगून जिल्हा बँकेच्या चांगल्या कामाबद्दल नामदार थोरात यांनी समाधान व्यक्त केले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात सहकाराचे रोपटे लावले. आज नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा राज्याला नव्हे तर देशाला दिशादर्शक ठरत आहे. राज्यातील सहकाराचे नेतृत्व करण्याचे काम संगमनेर करत आहेत. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा आनंद निर्माण केला आहे. जुन्या पिढीतील जाणकारांनी तळमळीने सहकार चळवळ वाढवली आताही आपण सर्वांनी जपली पाहिजे असे ते म्हणाले.

जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संस्कारातून संगमनेरात सहकारी चळवळीचा पाया घातला गेला आहे. त्यांचे संस्कार घेऊन जिल्ह्यामध्ये सहकार चळवळ वाढत आहेत. जिल्हा बँक ही आर्थिक शिस्त, काटकसर, पारदर्शकतेतून सुरू आहे. कठोर निर्णय घ्यावे लागतात पण ते सर्वांच्या भल्यासाठी आहे. या तालुक्याने कर्ज भरण्याची परंपरा व नैतिकता कायम जपली आहे. त्यामुळे यावर्षी एकाही सोसायटीमध्ये अनिष्ट तफावत राहिलेली नाही. 

सध्या बँकेत अत्यंत चांगले वातावरण असून कर्मचाऱ्यांसाठी व सेवा सोसायट्यांच्या सचीवांसाठी तीन लाखापर्यंत मेडिक्लेम बँकेने उतरवला आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनाही आजारपणाची संरक्षण मिळणार आहे. संगमनेर तालुक्याचे यावर्षी ९९.५५ टक्के वसुली केली असून ३८ शाखांपैकी ३५ टक्के शाखा वसुली मध्ये शंभर टक्के राहिले आहेत. या सर्वांमध्ये नामदार बाळासाहेब थोरात यांचे मोलाचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे असून या कामी सेवा सोसायट्यांमधील पदाधिकारी व सचिवांचे ही चांगले काम राहिले असल्याचे ते म्हणाले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !