◻ मंदिर परिसरात अतिक्रमणास झाल्यास जनसेवा मंडळाकडून आंदोलनाचा इशारा.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे श्रीराम मंदिर जागेतील अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रीतपणे काढल्यानतंर त्या जागेवर मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम लोकवर्गणीतून सुरू आहे. या जीर्णोद्धार कामासाठी संगमनेर तालुक्यातील कोणत्याही लोकप्रतिनिधींनी कोणतीही भरीव आर्थिक मदत केली नाही. तसेच मंदिराच्या परिसरात असलेल्या जागेत कुठलेही अतिक्रमण झाल्यास त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा जनसेवा मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यानी प्रसिध्दिसाठी दिलेल्या पत्रकात दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राम मंदिराच्या जागेत पूर्वी काही लोकांनी अतिक्रमण केले होते. त्या लोकांना विरोधी मंडळांनी साथ दिली. परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी एकत्रितपणे अतिक्रमण काढून त्याठिकाणी मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सर्वपक्षीय ग्रामस्थांनी हाती घेतले.
या कामासाठी दोन वर्षापूर्वी रामकथेच्या माध्यमातून तीन ते साडेतीन लाख रूपये लोकवर्गणी गोळा झाली, तिचा वापर या कामासाठी करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी मंदिराच्या कामासाठी बक्षीस सोडत योजना काढली त्यातून सुमारे ५० लाख रूपये जमा झाले असून अद्यापपर्यंत ग्रामपंचायतीने बक्षीस सोडत योजना जाहीर केलेली नाही. असे असताना ही गोळा झालेली रक्कम कुठे गेली असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
स्मशानभूमीत असलेले २५ ते ३० नारळाची झाडे ग्रामसभेची परवानगी न घेता काढून टाकण्यात आली आहे. तसेच या परिसरात गावातील जमा होणारा कचरा टाकला जात असल्याने या दुर्गधीचा त्रास अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी आलेल्या नागरिकांना होत आहे. ग्रामपंचायतीने स्मशानभूमीचा परिसर दुर्गधीमुक्त करावा त्याच बरोबर गावातील आठवडे बाजार भरत असलेल्या जागेत ग्रामपंचायतीने लहान मुलांची खेळणी व खुल्या व्यायाम शाळेचे साहित्य उभारल्याने बाजारसाठी येणाऱ्या व्यावसायिकांनी त्याची मोठी अडचण होत असल्याने ही खुली व्यायाम शाळा चांगल्या व प्रशस्त जागेत हलवावी.
या मागण्यांबरोबरच गावात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय खुलेआम सुरू आहे. त्याला ग्रामपंचायतीच्या काही सत्ताधारी लोकांचे पाठबळा आहे. हे अवैध व्यवसाय तातडीने बंद करण्याबाबत ग्रामसभेत ठराव करण्याची मागणी जनसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यानी केली आहे.
दरम्यान या प्रसिध्दी पत्रकावर जनसेवा मंडळाचे प्रमुख कार्यकर्त्ये माधवराव गायकवाड, विनायक बालोटे, अशोकराव म्हसे, भाऊसाहेब जऱ्हाड, हरिभाऊ ताजणे, ज्ञानेश्वर वाकचौरे, मिलिंद बोरा, जानकीराम गायकवाड, अजय ब्राम्हणे, साहेबराव बाचकर, रणजित गायकवाड, अशोक जऱ्हाड आदिंच्या सह्या आहेत.
प्रभु श्रीरामाच्या मंदिर जिर्णोध्दारासाठी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यानी १४ लाख रुपये निधी उपलब्ध करुण दिला. मंदिर पुर्णत्वास जात असल्याने विरोधक निवडणूक डोळ्यासमोर ठेवुन बेछुट आरोप करत आहेत. स्मशानभुमी विकासासाठी २० लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून ४० वर्ष याना परिसरातील कचरा व दुर्गधी दिसली नाही का.? गावात अवैध धंदे कुणाचे आहेत यांचे उत्तर विरोधकानी द्यावे व आम्हाला हिशोब विचारण्याआधी २ कोटी रुपयाच्या पाईप लाईनचा हिशोब विरोधकानी द्यावा.
विजयराव हिगें, मार्गदर्शक आश्वी बुद्रुक ग्रामपंचायत