संगमनेर Live | एक आदर्श संघटक आणि आपल्या सभोवताली सातत्याने चैतन्य निर्माण करण्याची क्षमता असलेले तसेच विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी करणारे चळवळीचे कार्यकर्त असलेल्या आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाने मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी वाहून घेतलेले व्यक्तिमत्व असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
आमदार विनायक मेटे यांच्या पहाटे झालेल्या दुर्दैवी अपघात निधनानंतर बोलताना आमदार थोरात म्हणाले की, विनायक मेटे हे माझे खूप चांगले मित्र होते. सातत्याने ते आपल्या आसपासच्या लोकांमध्ये चैतन्य निर्माण करायचे. आपली एखादं गोष्टी ते सहजतेने इतरांना पटवून द्यायचे. मराठा समाजाच्या प्रश्नांचा आणि त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. त्याचप्रमाणे शिवस्मारक समितीची जबाबदारी ही त्यांनी अत्यंत मोठ्या कार्यक्षमतेने सांभाळली. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही महाविकास आघाडीची आणि आमची सर्वांची सातत्याने भूमिका राहिली. या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आग्रहपूर्वक मांडणी केली होती. त्यांच्या आकस्मात निधनाने मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी लढणारे एक व्यक्तिमत्व हरपले असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
संघर्षशिल नेतृत्व हरपले -आमदार डॉ. तांबे
मराठवाड्यातून आलेल्या आमदार विनायक मेटे यांनी आपल्या प्रभावी वकृत्व कौशल्याने महाराष्ट्रात मोठा जनाधार निर्माण केला. प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि विशेषता मराठा आरक्षणासाठी त्यांनी केलेले विविध आंदोलन यामुळे ते महाराष्ट्रात मोठे लोकप्रिय झाले होते. मोठे संघटन कौशल्य असलेल्या या उमद्या नेतृत्वाच्या अपघाती निधनाने एक संघर्षशील लढवय्ये व्यक्तिमत्व हरपले असल्याची भावना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.