◻ गंगागिरी महाराज यांच्या १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाला आ. थोरात उपस्थित
◻ हरिनाम सप्ताह मधून वारकरी मानवताधर्माचा अमृत रस
◻ आमटी आणि भाकरीचा प्रसाद प्रत्येक भाविकासाठी मोठी अनुभूती
संगमनेर Live | संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांपासून विविध संतांची मोठी परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाने भेदभावाला थारा न देता मानवता धर्म वाढीची शिकवण दिली आहे. हीच परंपरा गंगागिरी महाराज सप्ताहातून जपली जात असल्याने लाखो भाविकांची हा अखंड हरिनाम सप्ताह श्रद्धास्थान असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
श्रीक्षेत्र कोकमठाण येथे सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज यांच्या १७५ व्या अखंड हरिनाम सप्ताहात सातव्या दिवशी सरला बेटाचे प्रमुख महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रवचन सेवा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार आशुतोष काळे, श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे, विवेक कोल्हे, सौ. स्नेहलता कोल्हे, ह.भ.प. नवनाथ महाराज आंधळे, आकाश नागरे, तुषार पोटे, सुभाष सांगळे, सचिन दिघे, सचिन खेमनर, विठ्ठलदास असावा, विक्रम दंडवते, मधु महाराज आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार थोरात म्हणाले की, वारकरी संप्रदायाला हजारो वर्षांची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, चोखामेळा, संत गोरा कुंभार अशी विविध संतांची मांदियाळी या संप्रदायात आहे. वारकरी संप्रदाय हा साधा भोळा धर्म आहे. कपाळी बुका आणि हरी नामाचा जागर हा सोपा अध्यात्माचा मंत्र या पंथामध्ये आहे. हजारो वर्षांची परंपरा लाभलेल्या या संप्रदायाने मानवतेचा धर्म शिकवला आहे. या पंथामध्ये लहान मोठा अशा कोणताही भेद नसतो. या व्यासपीठावर सर्वजण एकत्र येतात. राजकारण बाजूला ठेवून सर्व एकत्र असतात किंबहुना अंतकरण शुद्ध करण्याची हे व्यासपीठ आहे.
शेकडो वर्षाच्या वारकरी संप्रदायाच्या मंथनाचा सार हरिभक्त परायण महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रवचनातून लाखो भावी भक्तांना मिळत असतो.
मागील दोन वर्ष कोरोनाचे मोठे संकट आल्याने ऑनलाइन पद्धतीने अनेकांनी हा सप्ताह अनुभवला. मात्र यावर्षी कोरोना संकट संपल्याने लाखो भाविक एकत्र आले आणि नव्या डिजिटल युगामुळे लाखो भाविक ऑनलाईन पद्धतीने प्रवचन आणि कीर्तनाचा आनंद घेत आहे. यावर्षी सर्वत्र पाऊसही चांगला झाला आहे. धरणे ही भरली आहेत. हे परमेश्वराचेच आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे.
मानवता सेवा हाच खरा धर्म असून हाच विचार या संप्रदायाने दिला आहे. महंत गंगागिरीजी महाराज, नारायणगिरीजी महाराज यांचा समर्थ वारसा परमपूज्य रामगिरी महाराज पुढे चालवत आहेत. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान हा सप्ताह ठरला आहे. येथील आमटी आणि भाकरी हा प्रसाद तर महाराष्ट्रातील प्रत्येक भाविकासाठी मोठी अनुभूती आहे.
याप्रसंगी महंत रामगिरीजी महाराज यांचे हरी प्रवचन झाले. याप्रसंगी लाखो भाविकांचा जनसमुदाय उपस्थित होता.
थोरात कारखान्याची मदत..
आमदार बाळासाहेब थोरात यांची सरला बेट आणि या सप्ताहावर नितांत श्रद्धा असून दरवर्षी या सप्ताहात अमृत उद्योग समूह व थोरात कारखान्याची मोठी मदत असते. यावर्षीही चिवड्यासाठीचा महाप्रसाद, आमटी बनवण्याचे यंत्र, बुंदी सुकवण्याची यंत्रणा यांची विविध मदत ही सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने पुरवली आहे.