◻️ ‘काळ आला होता पण, वेळ नव्हती आली’ ; बिबट्याच्या दहशतीने परिसर धास्तावला
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल शेतकरी दामोधर विश्वनाथ क्षिरसागर यांच्यावर सोमवारी सांयकाळी बिबट्याने हल्ला करुन जखमी केल्याची घटना उघडकीस आली असून दामोधर क्षिरसागर यांना प्राथमिक उपचारानतंर घरी सोडण्यात आले आहे. या बिबट्याच्या दहशतीने परिसर धास्तावला असल्याचे चित्र आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेतकरी दामोधर क्षिरसागर हे सोमवारी सांयकाळी ७ वाजेच्या सुमारास गावातून घराकडे दुचाकीवरुन चालले होते. यावेळी शिकारीच्या शोधात प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या गायकवाड वस्तीजवळ दबा धरुन बसलेल्या बिबट्याने क्षिरसागर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्यानी मोठ्याने आरडा - ओरड केल्यामुळे थोडक्यात ते बचावले असून त्याच्या पायाला बिबट्याने पंजा मारल्यामुळे दुखापत झाली आहे. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र आश्वी खुर्द येथे उपचार झाल्यानतंर त्याना घरी सोडण्यात आले आहे. याप्रसंगी ‘काळ आला होता पण, वेळ नव्हती आली’ अशी प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थानी दिली आहे.
दरम्यान मागील अनेक दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर असून शेतकऱ्याच्या पशुधनासह पाळीव कुत्र्यावर हल्ले झाल्याची माहिती शेतकऱ्यानी दिली आहे. स्वामी समर्थ मंदिर ते आश्वी खुर्द ग्रामपंचायतीची पाणी पुरवठ्याची सहकारी विहीर या दरम्यान नागरीकासह शाळकरी मुले यांची नियमित वर्दळ असल्याने या रस्त्यावर हायमँक्स दिवे अथवा स्ट्रीट लाईट बसवण्यासह पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक शेतकरी व नागरीकानी केली आहे.