◻️ दै. सामनाच्या आजच्या आग्रलेखात थेट ना. विखे पाटील व भाजपवर टिकास्त्र
◻️ खा. छत्रपती उदयनराजे यांच्या भुमिकेचे स्वागत
◻️ सामनाचा आग्रलेख जसाशा-तसा.. वाचा
महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून मंत्र्या - संत्र्यांपर्यंत प्रत्येकजण स्वतःस महामहोपाध्याय किंवा शिवशाहीर असल्याच्या आविर्भावात डफावर थाप मारीत आहे, पण ही लोणकढी थापच म्हणावी लागेल! विखे पाटील हे कधीकाळी मर्दमऱ्हाठे मावळे म्हणून शिवरायांचे भक्त होते. आज भाजपात जाऊन त्यांना शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे गुणगान करावे लागते. वीर मराठय़ांचा हा देश आहे या कल्पनेस यामुळे धक्का बसतो. एकंदरीत भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयन राजे म्हणतात तेच खरे की, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात.?’ हा निर्लजपणाच आहे!
भारतीय जनता पक्ष हा नक्की किती तोंडी नाग आहे? त्यावर आता नव्याने संशोधन करायला हवे. एखाद्या विषयावर हवे तेव्हा वळवळायचे किंवा फूत्कार सोडायचे व नको असेल तेव्हा बिळात घुसायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रश्नी भाजप नेमके हेच करीत आहे. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी करूनही त्यांच्या धमन्या थंडच आहेत व ज्यांनी उसळून तलवार काढली आहे त्यांच्यावर हल्ले सुरू केले आहेत.
आता महसूलमंत्री विखे पाटील यांनी राज्यपालांचा बचाव केला आहे. कोश्यारींविरोधात लोकभावना भडकविण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे विखे पाटलांनी सांगितले. विखेंनी असे बोलणे हा महाराष्ट्राच्या लोकभावनेचाही अपमान आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपतींच्या संदर्भात अपमानास्पद विधाने करावीत हे विखे पाटील वगैरे लोक सहन करतील; कारण सध्या ते ज्या पक्षाच्या पखाली वाहत आहेत त्या पक्षाचे ते धोरण आहे. पण विखे पाटलांचे मत हे महाराष्ट्राचे तर सोडाच, पण त्यांच्या नगर जिल्हय़ाचेही मत नाही. त्यामुळे त्यांच्या बुळचट भूमिकांकडे लक्ष द्यायचे कारण नाही.
सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खवळून सांगितले, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर राहतात हा निर्लज्जपणा आहे.’ यावर विखे पाटील वगैरे लोकांचे काय म्हणणे आहे? राज्यपालांविरुद्ध लोकभावना भडकलेल्याच आहेत. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही, पण दुःख हे की, महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री अपमानाचे समर्थन करीत आहेत. आता आमच्या वाचकांसाठी अपमानाचे एक वेगळेच प्रकरण समोर आणतो.
गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदी यांची तुलना शंभर तोंडांच्या रावणाशी करताच मोदी व त्यांच्या लोकांनी लगेच काँग्रेस व खरगेंवर प्रतिहल्ले सुरू केले. मोदींना रावणाची उपमा देणे हा गुजरातचा व गुजरातच्या सुपुत्राचा अपमान असल्याचे जाहीर सभांतून ढोल-नगारे वाजवून सांगण्यात येत आहे. गुजराती जनतेने मोदींच्या अपमानाचा बदला घेतला पाहिजे असे मोदी सांगू लागले. पंतप्रधानांचा अपमान करणे हे चूकच आहे. मात्र जर मोदींना रावण म्हटल्याने गुजराती अस्मितेचा अपमान ठरत असेल तर छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ‘भाजप’ पाठीशी घालते, त्यांचा बचाव करते यास काय म्हणावे?
मोदींचा अपमान हा गुजरातचा अपमान, पण छत्रपतींचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान नाही असे भाजपचे म्हणणे आहे. मोदींना रावण म्हटल्याने गुजरातच्या लोकभावना भडकू लागल्या, पण छत्रपतींच्या अपमानानंतर मराठी जनता भडकताच हा म्हणे विरोधकांचा डाव आहे, असे भाजप सांगत आहे. यावरून भाजपचे शिवराय प्रेम हे ढोंग असल्याचे सिद्ध होते.
छत्रपतींचा अपमान राज्यपाल कोश्यारी, राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व राज्याचे पर्यटनमंत्री लोढा यांनी केला. लोढा हे बिल्डर आहेत व त्यांनी बांधलेल्या गृहसंकुलात मांसाहार करणाऱ्यांना प्रवेश नाकारला गेल्याचे प्रकरण गाजले होते. आताही तीच परिस्थिती आहे. इतिहास काळात लोढा हे बिल्डर असते व छत्रपतींच्या मावळय़ांनी, सरदारांनी त्यांच्या गृहसंकुलात प्रवेश केला असता तर त्यांची काय भूमिका असती? कारण मावळे हे तसे मांसाहारीच होते व आहेत. लोढा यांनी मावळय़ांनाही ते मांसाहारी आहेत म्हणून बंदीच घातली असती. त्यामुळे याबाबतीतही धोरण ठरले पाहिजे.
छत्रपतींवर अद्वातद्वा बोलण्यातचमंत्र्यांचा वेळ चालला आहे. इतिहास चिवडण्याचे कामही काही लोकांनी वेगाने सुरू केले. वेडात दौडलेल्या सात मराठी वीरांवरच आक्षेप घेतल्याने आता नवा इतिहास लिहावा लागतो की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवरायांचा इतिहास हा प्रेरणादायी आहे व त्यातूनच महाराष्ट्रात शौर्याची बीजे रोवली गेली. इतिहासात काही सत्यकथा तर काही दंतकथा असू शकतात. तशा त्या पौराणिक कथांत, महाभारत व रामायणातही असतील. मात्र म्हणून त्यावर आता चिवडाचिवड करण्याची गरज नाही.
स्वराज्याची गरज होती म्हणून महाराजांनी अफझल खानाचा कोथळा काढला. शाहिस्ते खानाची बोटे छाटली. स्वराज्याचा लढा साधा नव्हता. ते एक महान शौर्य होते. चारशे वर्षांनंतर त्या इतिहासावर संशोधन करून आता काय साध्य होणार? आधीच शालेय क्रमिक पुस्तकांतून खरा इतिहास हद्दपार झाला. तेथेच मऱहाठी मनगटे थंड पडली. त्यात आता महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून मंत्र्या-संत्र्यांपर्यंत प्रत्येकजण स्वतःस महामहोपाध्याय किंवा शिवशाहीर असल्याच्या आविर्भावात डफावर थाप मारीत आहे, पण ही लोणकढी थापच म्हणावी लागेल!
विखे पाटील हे कधीकाळी मर्दमऱ्हाठे मावळे म्हणून शिवरायांचे भक्त होते. आज भाजपात जाऊन त्यांना शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे गुणगान करावे लागते. वीर मराठय़ांचा हा देश आहे या कल्पनेस यामुळे धक्का बसतो. एकंदरीत भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयन राजे म्हणतात तेच खरे की, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात.?’ हा निर्लजपणाच आहे!