◻️ ना. विखे पाटील यांच्या हस्ते आश्वी बुद्रुक येथील १ कोटी ९९ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा
शुभारंभ
◻️ राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थीना साहीत्य वितरण व मोफत अपघात विमा योजनेच्या माध्यमातून मृत वारशांच्या कुटूबियांना धनादेश वाटप
संगमनेर Live | केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले जलजीवन मिशन हे एक क्रांतीकारी पाऊल असून तालुक्यात या योजनेसाठी ७५१ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. डबल इंजिन सरकारच्या कामाचा हा परीणाम असल्याचे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
जलजीवन मिशन अंतर्गत संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील सुमारे १ कोटी ९९ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अशोकराव म्हसे, कैलास तांबे, भगवानराव इलग, पोपटराव वाणी, दिनकर गायकवाड, माधवराव गायकवाड, भाऊसाहेब जऱ्हाड, विनायकराव बालोटे, विजय चतुरे, रामभाऊ भुसाळ, मच्छिंद्र थेटे, अँड. रोहीणीताई किशोर निघुते, कांचनताई मांढरे, गुलाबराव सांगळे, अशोक जऱ्हाड, हरिभाऊ ताजणे, शाळीग्राम चंद, प्रकाश उंबरकर, जेऊरभाई शेख, शिवाजीराव इलग, प्रा. कान्हु गिते, हंभप शांताराम जोरी, सचिन शिदें, सतिष जोशी, विजय म्हसे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थींना साधन साहीत्याचे वितरण आणि मोफत अपघात विमा योजनेच्या माध्यमातून मृत वारशांच्या कुटूबियांना धनादेश देण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मंत्री विखे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ग्रामीण भागात विकास साध्य करताना पायाभूत सुविधांना प्राधान्य दिले. जल जीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ सालापर्यत प्रत्येक घरात शुध्द आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या माध्यमातून कृषि विकासाला चालना देण्यासाठी अर्थ संकल्पात २० लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने ग्रामीण भागात कृषी पूरक व्यवसायातून मोठे रोजगार निर्माण होतील आशी अपेक्षा व्यक्त करून सेवा सहकारी सोसायट्यांना सुध्दा मल्टीर्पपजचा दर्जा देण्याचा निर्णय सहकारातून रोजगार निर्मितीला उपयुक्त करणार असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.
महसूल विभागाने सलोखा योजना सुरू करून शेतकऱ्यांच्या जमीनीचे वाद बांधावर मिटविण्याची मोठी मोहीम हाती घेतली. वर्षानुवर्षे चालणारे वाद सलोखा योजनेतून मिटविण्यासाठी अधिकार्यानी पुढाकार घेण्याचे आवाहन करतानाच दुग्ध व्यवसायातून रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी राज्यात दुधाळ जनावारांच्या किंमतीत वाढ करण्यात आली असून समाजातील शेवटचा घटक डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकार निर्णय करीत असून डबल इंजिन सरकारमुळे विकासला गती मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.