◻️ निळवंडेचे पाणी येणे हा तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण - आमदार थोरात
◻️ भजन, अभंग आणि आकर्षक रोषणाईसह मोठ्या जल्लोषात पाणी पूजन
संगमनेर LIVE | उत्तर नगर जिल्ह्यातील १८२ दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्याचे पूजन धरणासाठी व कालव्यासाठी सातत्याने काम करणारे महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाले असून हा तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन आमदार थोरात यांनी केले आहे.
पिंपळगाव कोंझिरा येथील बोगद्यालगत संगमनेर तालुक्यात आलेल्या निळवंडेच्या पाण्याचे मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी या धरणाचे व कालव्यांचे जनक आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, ॲड. माधवराव कानवडे, बाबासाहेब ओहोळ, रामहरी कातोरे, नवनाथ आरगडे, मिलिंद कानवडे, संतोष हासे, विश्वासराव मुर्तडक, उत्तमराव घोरपडे आदींसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपळगाव कोझीरा बोगद्यालगत तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने कालव्यांच्या दुतर्फा मोठी विद्युत रोषणाई करण्यात आली होती . यावेळी लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांची पारंपारिक वाद्यात ग्रामस्थांनी मोठी मिरवणूक काढली. आकर्षक आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर, पारंपारिक वाद्य, सुवासिनीचे औक्षण यांसह तरुण नागरिक व आबालवृद्धांसह सर्वांचा जल्लोष हे या आनंददायी सोहळ्याची वैशिष्ट्य ठरले. अत्यंत संस्मरणीय ठरलेल्या या रम्य सायंकाळी आमदार थोरात यांच्या संकल्पनेतून कालव्याच्या किनारी कार्यकर्त्यांनी भजन व अभंग गाऊन वातावरण मंत्रमुग्ध केले .
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, निळवंडे धरण व कालवे व्हावे हे आपले स्वप्न होते. १९८५ पासून या कामाचा पाठपुरावा सुरू केला. १९९२ ला सुरुवात झाली. परंतु कामाला १९९९ पासून गती मिळाली. अनेक अडचणीवर मात करून धरण पूर्ण केले. कालव्यासाठी मोठा निधी मिळवला. इतक्या दिवसाच्या अथक परिश्रमानंतर तालुक्यात आलेले पाणी हा जीवनातील आनंदाचा क्षण आहे. याचबरोबर संगमनेर तालुक्यासाठी ऐतिहासिक क्षण असून यामुळे दुष्काळी भागातील जनतेच्या जीवनात मोठे परिवर्तन होणार आहे. त्यांच्या अर्थव्यवस्थेत मोठा बदल होणार आहे.
आपण कधीही श्रेयासाठी काम केले नाही. या यशामध्ये अनेकांचे योगदान आहे. अनेकांनी त्याग केलेला आहे. सर्वांच्या कामातून व त्यागातून आजचा हा सुवर्ण दिवस उगवला आहे. डाव्या कालव्याचे काम सहा महिन्यापूर्वी झाले होते. धरणात पाणी शिल्लक असताना यातून चाचणी व्हावी यासाठी आपण पाठपुरावा केला. उजव्या कालव्याचे कामही तातडीने व्हावे हाच आपला कायम आग्रह आहे.
अनेक जण श्रेयासाठी झटत आहेत. मात्र आपण कामाला महत्त्व देतो धरण व कालव्यांची कामे कोणी केली हे ही सर्व जनतेला माहित असल्याचेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.
डॉ. तांबे म्हणाले की, निळवंडे धरण व कालव्यांचे खरे श्रेय हे आमदार बाळासाहेब थोरात यांचेच असून त्यांनी जीवनाचे ध्येय मानून धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. दुष्काळी माणूस व गरिबांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा यासाठी हे काम केले असून ही स्वप्नपूर्ती होत असल्याने हा तालुक्याच्या भाग्याचा दिवस ठरत आहे .
यावेळी तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पिंपळगाव कोंझिरा, वडगाव लांडगा, जवळे कडलग व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नागरिक, महिला, युवक, यांचे सह निळवंडे पाट पाणी कृती समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कालवे पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांची मोठी गर्दी..
आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून झालेल्या कालव्यांमधून येणारे पाणी व कालवे पाहण्यासाठी दुष्काळी भागातील नागरिकांसह शहरातील नागरिक ,महिला, तरुण यांसह शेजारील विविध तालुक्यांमधून अनेक शेतकरी कालवे व पाणी पाहण्यासाठी कालव्यांवर येत आहे.