◻️ निझर्णेश्वर येथे जनसेवा मंडळ मेळावा संपन्न
◻️ प्रवरा सहकारी बॅक व राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचीत पदाधिकारी आणि संचालकांचा संत्कार
◻️ पाहुण्या - रावळ्याकडून या भागात विकास प्रक्रीयेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न
◻️ प्रकल्प मार्गी लागत असल्याचे समाधान आहे ; कोणाला काय श्रेय घ्यायचे ते जरूर घ्यावे
संगमनेर LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशिर्वाद, जनता आणि कार्यकर्त्यांच्या भक्कम पाठबळामुळेच राज्यात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळालेल्या संधीतून जनतेच्या हिताचे निर्णय आपण करीत आहोत. परंतू आपल्या निर्णयाशी आणि परिसराच्या विकासाची असुया काहींना वाटत आहे त्यामुळेच चांगल्या कामात अडथळे निर्माण करण्याचे काम सुरु झाले आहे. यापुर्वी सुध्दा बाहेरुन आलेली आव्हानं परतवून लावण्याचे काम कार्यकर्त्यांनी संघटीतपणे केले आहे. संघटनेची ताकद हेच आपल्या यशाचे बलस्थान असल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्री. क्षेत्र निझर्णेश्वर येथे जनसेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधला. नुकत्याच संपन्न झालेल्या प्रवरा सहकारी बॅक, राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचीत पदाधिकारी आणि संचालकांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास प्रवरा बॅकेचे नुतन चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू, डॉ. विखे पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव कडू, बापूसाहेब गुळवे, कैलासराव कोते, कैलासराव तांबे, निवृत्त सनदी आधिकारी शिवाजीराव जोंधळे, भाऊसाहेब जेजूरकर, दिपक पठारे आदि याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, जनसेवा मंडळाच्या माध्यमातून खासदार साहेबांनी असंख्य कार्यकर्ते जोडले. विचारांवर आधारित कार्यकर्त्यांचे संघटन हेच आपल्या यशाचे बलस्थान आहे. एका विचाराने आणि समन्वयाने संघटनेची सुरु असलेली वाटचाल ही प्रवरा उद्योग समुहातील सर्व संस्थाच्या प्रगतीत आणि राजकीय यशामध्ये प्रतिबिंबीत होत असल्याचे त्यांनी नमुद केले. या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना विकास कामात आपण कुठेही मागे नाही, उलट प्रत्येक निवडणूकीत दिलेला शब्द पुर्ण करणे हेच आपले ध्येय असते. निळवंडे पाण्याच्या बाबतीत सुध्दा दिलेला शब्द पुर्ण करुन, वचनपुर्ती केले असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या भागातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करणे याचे नियोजन आता सुरु झाले आहे. यासाठी शेती महामंडळाच्या जमीनींचा उपयोग करण्यासाठी शासनाने आपल्याला परवानगी दिली आहे. या जमीनींवर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांबरोबरच आयटी पार्क उभारण्याचा निर्णय झाला असून, प्रशासकीय स्तरावर याचे कामही सुरु झाले असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी सांगितले की, अनेक युवक आता प्रशासकीय सेवेत जाण्यासही ईच्छुक आहेत. या युवकांना मोफत प्रशिक्षण देण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने नेहमीच पुढाकार घेतला आहे. पोलिस भरतीच्या प्रशिक्षणासाठी सुध्दा मोफत सुविधा संस्थेने उपलब्ध करुन दिल्याने त्याचा अनेकांना लाभ मिळाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादाने राज्यात मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने जनतेच्या हिताचे निर्णय महसूल विभागाच्या माध्यमातून होत आहेत. या विभागातून यापुर्वी जे निर्णय घेतले गेले नाहीत, ते निर्णय करुन सामान्य माणसाला दिलासा देण्याचे काम सुरु आहे.
कामाची आणि निर्णयांची तुलना आता जनता करु लागली आहे, याची असुया काहींना वाटत असल्यामुळेच आता पाहुणे रावळे येवून या भागात आपल्या विकास प्रक्रीयेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यापुर्वी सुध्दा राज्यातील आणि जिल्ह्यातील लोकांनी आपल्यापुढे आव्हानं निर्माण करण्याचे प्रयत्न केले. परंतू कार्यकर्त्यांच्या संघटीत शक्तीने ही आव्हानं परतवून लावले असल्याचा टोला त्यांनी लगावला.
याप्रसंगी माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. भास्करराव खर्डे यांची भाषणे झाली. सर्वांचे स्वागत संचालक कैलासराव तांबे यांनी केले तर आभार व्हा. चेअरमन विश्वासराव कडू यांनी मानले.
याच श्री क्षेत्र निझर्णेश्वर येथे निळवंडे धरणाचे पाणी आणण्याचा शब्दत मी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिला होता, त्याची पुर्तता आता होत आहे. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी पुढाकार घेतल्यामुळेच आज लाभक्षेत्रात पाणी येवू शकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या खर्चाकरीता प्रशासकीय मंजुऱ्या दिल्या. प्रकल्प मार्गी लागत असल्याचे समाधान आहे. कोणाला काय श्रेय घ्यायचे ते जरूर घ्यावे. आम्हाला आता आरोप प्रत्यारोप आणि टिका टिपणी करण्यात कोणतेही स्वारस्य नाही. पाण्याचा प्रवाह कुठून येणार होता हे सर्वांनाच समजले आहे.