आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत जिल्हा बँकेची प्रगतीकडे वाटचाल - पालकमंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
◻️ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोबाईल अँपचे उद्घाटन

संगमनेर LIVE (अहमदनगर) | अहमदनगर जिल्हा बँकेने मोबाईल बँकिंग अॅप सेवा सुरू करून बँकिंग स्पर्धेच्या युगात एक पुढचे पाऊल टाकत प्रगतीकडे वाटचाल करत आहे. शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महसूल पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मोबाईल अँप उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन समारंभात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खा. डॉ. सुजय विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, अण्णासाहेब मस्के, माजी आमदार भानुदास मुरकुटे, बँकेचे मुख्य कार्यक्रम अधिकारी रावसाहेब वर्पे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की, आशिया खंडात आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही पहिली असून राज्यात बँकेचा नावलौकिकही आहे. बँकेने शेतकरी, कारखानदार तसेच महिला बचतगटांना गरजेच्या वेळी कर्जाच्या माध्यमातून आर्थिक मदत केली आहे. ही बँक यावरच थांबली नसून इतर बँकेच्या स्पर्धेत स्वतः चे अस्तित्व टिकवत अधिक दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांनी बँकेच्या ठेवी ह्या आठ हजार ५५५ कोटीच्या असल्याचे सांगून ११ हजार ८६१ कोटी रुपयांचे खेळते भांडवल आहे. २८७ शाखा तर ११ विस्तार कक्षाद्वारे बँक  सेवा देत असुन बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज मोबाईल बँकिंग अँप सुरू केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी प्रास्ताविक केले. या समारंभात महिला बचतगटांना कर्जाचे धनादेश वाटप करण्यात आले.

दरम्यान या कार्यक्रमास बँकेचे संचालक, शेतकरी सभासद, पदाधिकारी, अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !