विचारांशी प्रतारणा करुन तुम्‍ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्‍व हाचं मोठा कलंक - ना. विखे पाटील

संगमनेर Live
0
◻️ मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्याकडून शिवसेनेच्या उध्‍दव ठाकरे यांच्‍या वक्‍तव्याचा समाचार 

◻️ आश्वी बुद्रुक येथे भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने ना. विखे पाटील यांच्या उपस्थितीत महा जनसंपर्क अभियान सुरु

◻️ सत्‍ता आणि पद गेल्‍याचे वैफल्‍य याचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे उध्‍दव ठाकरे

संगमनेर LIVE | विचारांशी प्रतारणा करुन, मागील अडीच वर्ष तुम्‍ही आघाडी सरकारचे केलेले नेतृत्‍व हाच महाराष्‍ट्राला सर्वात मोठा कलंक होता अशा शब्‍दात महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उध्‍दव ठाकरे यांच्‍या वक्‍तव्याचा समाचार घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्‍याबद्दल भारतीय जनता पक्षाच्‍या वतीने महा जनसंपर्क अभियान सुरु करण्‍यात आले आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघातील अभियानाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत आश्‍वी बु. करण्‍यात आला. 

भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास जेष्‍ठनेते शाळीग्राम होडगर, बापूसाहेब गुळवे, प्रवरा बॅकेचे व्‍हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, रामभाऊ भूसाळ, विजयराव चतुरे, कैलासराव तांबे, सौ. रोहीणी निघुते, सौ. कांचन मांढरे, अशोकराव म्‍हसे, भगवानराव इलग, विनायकराव बालोटे, अजय ब्राम्हणे, अनिल भोसले, अशोक जऱ्हाड, जेहूरभाई शेख, बापूसाहेब गायकवाड, मकरंद गुणे, शिवाजीराव इलग, सतिष जोशी, साई मांढरे, रंभाजी इलग, सीताराम चांडे, योगेश रातडीच्या यांच्‍यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी या महाजनसंपर्क अभियानाच्‍या माध्‍यमातून केंद्र सरकारच्‍या योजनांची माहीती नागरीकांना पत्रक वाटून घरोघरी जावून दिली. याप्रसंगी आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी भाजपा नेते उपमुख्‍यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्‍या संदर्भात उध्‍दव ठाकरे यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याचा चांगलास समाचार घेतला. सत्‍ता आणि पद गेल्‍याचे वैफल्‍य कसे असू शकते याचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे उध्‍दव ठाकरे आहेत. 

राजकारणात टिका केली जाते परंतू टिका करण्‍याची पातळी उध्‍दव ठाकरे यांनी सोडली असल्‍याची टि‍का करुन, ते म्‍हणाले की, स्‍वत:च्‍या वडीलांच्‍या विचारांनाही तुम्‍ही कलंक लावला. विचारांची तडजोड करुन, सत्‍ता स्‍थापन केली. आपल्‍या सत्‍तेच्‍या काळातच औरंगजेबाच्‍या कबरीवर फुले वाहीली गेली. महाराष्‍ट्राला तो कलंक तुमच्‍यामुळेच लागला. स्‍वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कॉंग्रेस नेत्‍यांकडून होत होता. तेव्‍हाही तुम्‍ही त्‍यांच्‍या मांडीला मांडी लावून बसलात. क्रांतीकारकांच्‍या विचारांना तुम्‍ही कलंकीत केले.

कोव्‍हीड काळात मुंबई महापालिकेतील घोटाळे आता बाहेर येत आहेत. हा कलंक तुम्‍ही कसा विसरता? असा सवालही त्‍यांनी आपल्‍या भाषणातून केला. देशामध्‍ये आज मोदीजींच्‍या विरोधात तिसऱ्या आघाडीचा होत असलेला प्रयोग कधीही यशस्‍वी होणार नाही. आघाड्यांचे प्रयोग कसे असतात हे महाराष्‍ट्राने अनुभवले आहे. विरोधकांच्‍या वर्जमुठीला तडे जाणार हे मी यापुर्वीच सांगितले होते. आता मुठही शिल्‍लक राहीलेली नाही. केवळ व्‍यक्तिव्‍देशापोटी मोदीजींवर टिका करण्‍याचे काम सुरु आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी परदेशात जावून देशाच्‍या लोकशाही व्‍यवस्‍थेवर टिका करतात परंतू त्‍यांना निवडणूकीत जनाधार मिळत नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळण्‍याचे संख्‍याबळही या पक्षाकडे आता राहीलेले नाही. परंतू या विरोधकांना जनतेच्‍या मनात कोणतेही स्‍थान नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली सरकारने ९ वर्षात केलेली कामगि‍री ही संपूर्ण जगासमोर आहे. आज वेगाने वाढणारी अर्थव्‍यवस्‍था म्‍हणून भारत देशाकडे पाहीले जात आहे. कोव्‍हीड संकटातही आत्‍मनिर्भर पॅकेजच्‍या माध्‍यमातून या देशातील जनतेला केंद्र सरकारने आधार दिला. आज समाजातील सर्वच घटकांना विविध योजनांच्‍या माध्‍यमातून विकासाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणण्‍याचे काम पंतप्रधान मोदीजींच्‍या नेतृत्‍वाखाली होत आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्‍याणाचा मार्ग मोदी यांनी सर्वांना दाखवून दिला.

योजनांचा लाभ थेट लाभार्थ्‍याच्‍या  खात्‍यात जमा होत असल्‍याने केंद्र सरकारची पारदर्शकता जनतेसमोर आली आहे. ९ वर्षात भ्रष्‍ट्राचाराचा एकही आरोप केंद्र सरकारवर होवू शकला नाही. हाच अभिमान देशवासियांना असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले. केंद्र सरकारच्‍या योजनांची प्रभावी अंमलबजावणी राज्‍य सरकार करीत आहे. मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली डबल इंजिनच्‍या सरकारला आता उपमुख्‍यमंत्री अजीत पवारांच्‍या माध्‍यमातून तिसरेही इंजिन जोडले गेल्‍याने हे सरकार आता वेगान पुढे जात असून, गतीमानतेने निर्णयांची अंमलबजावणी होत आहे.

शासन आपल्‍या दारी या उपक्रमातून लाखो नागरीकांना मिळत असलेला न्‍याय ही राज्‍य सरकारची खरी उपलब्‍धी आहे. आता प्रशासनातील आधिकाऱ्यांना लोकांमध्‍ये जावून योजनांची अंमलबजावणी करण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आल्‍या असल्‍याकडे लक्ष वेधून, मंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, महसूल विभागाच्‍या माध्‍यमातून नव्‍या  धोरणांची अंमलबजावणी होत आहे. दूध दरवाढीच्‍या संदर्भात सुध्‍दा लवकरच सकारात्‍मक निर्णय होणार असल्‍याचा दिलासा त्‍यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

याप्रसंगी जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर यांनीही आपले मनोगत व्‍यक्‍त  केले. या महाजनसंपर्क अभियानांच्‍या माध्‍यमातून मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित नागरीकांच्‍या समस्‍यांही जाणून घेतल्‍या. आलेल्‍या निवेदनांवर तातडीने कारवाई करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी उपस्थित आधिकाऱ्या दिल्‍या.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !