◻️ नगर जिल्ह्यातील ५१० केंद्राचे औपचारिक उद्घाटन संपन्न
◻️ शेतकऱ्यांना खतासह योग्य मार्गदर्शन व सल्ला मिळणार
संगमनेर LlVE (राहाता) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेले किसान समृध्दी केंद्र हे शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरतील असा विश्वास माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बॅकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी व्यक्त केला.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ लाख २५ हजार किसान समृध्दी केंद्राचे लोकार्पण राजस्थान येथून केले. नगर जिल्ह्यातील ५१० केंद्राचे औपचारिक उद्घाटन या निमित्ताने संपन्न झाले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुरदृष्य प्रणालीतून साधलेला संवादही उपस्थितांनी पाहीला. उत्तर नगर जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम बाभळेश्वर येथील कृषि विज्ञान केंद्रात संपन्न झाला. याप्रसंगी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी हिताच्या निर्णयांचे कौतुक करुन किसान समृध्दी केंद्र हे कृषि क्षेत्रासाठी मार्गदर्शनाचे महत्वपूर्ण काम करतील असेही सांगितले.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा सहकारी बॅकेचे व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, रामभाऊ भूसाळ, कैलास तांबे, भाजयुमोचे तालुका अध्यक्ष सतिष बावके, तुकाराम बेंद्रे, सतिष ससाणे, जिल्हा अधिक्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषि आधिकारी भोरे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख आदि याप्रसंगी उपस्थित होते.
आपल्या भाषणात आण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले की, या केंद्राच्या उपलब्धतेमुळे आता शेतकऱ्यांना कोणत्या खताची गरज आहे याचा योग्यतो सल्ला मिळेल. कारण आज विनाकारण शेतकऱ्यांवर अनेक औषधांची सक्ती करुन ते लादले जातात, याला निश्चित आळा बसेल. केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती विषयक बदलांचे ज्ञानही मिळणार असल्याने ही केंद्र आता कृषि विज्ञान केंद्रांप्रमाणेच गावपातळीवर काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी आपल्या भाषणात कृषि विज्ञान केंद्राचे महत्व विषद करुन, एकाच छताखाली कृषि निविष्ठा उपलब्ध होतील. माती परिक्षणापासून ते बियाणे आणि औषधांची चाचणी सुध्दा या केंद्राच्या माध्यमातून होणार असल्याने शेतक-यांची फसवणूक थांबेल, तसेच पर्यायी खतांचा वापर कृषि क्षेत्रात योग्य पध्दतीने व्हावा म्हणून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले तर, सेंद्रीय शेतीचे प्रधानमंत्र्यांचे स्वप्न निश्चित पुर्ण होवून विशमुक्त शेतीकडे वळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल असे त्यांनी सांगितले.
जिल्हा अधिक्षक कृषि आधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये १ हजार ८५० किसान समृध्दी केंद्र सुरु झाली असून, या केंद्रातून आता गुणवत्ता पुर्ण कृषि साहित्य वितरीत करण्याची जबाबदारी वाढली आहे. महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने आज जिल्ह्यात ५१० ठिकाणी या केंद्रांची औपचारिक सुरुवात झाली असून राहाता तालुक्यात १९ ठिकाणी केंद्राच्या उद्घाटनाचे कार्यक्रम होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याने १ रुपयात पिक विमा योजनेमध्ये मोठी आघाडी घेतली असून, मागील वर्षापेक्षा तीनशे टक्क्यांची वाढ शेतकऱ्यांच्या सहभागामुळे झाली असल्याचे त्यांनी सांगितले.