◻️ खा. डॉ. सुजय विखे पाटील यांचे अमृत भारत योजनेच्या पायाभरणी समारंभानंतर प्रतिपादन
◻️ येणाऱ्या काळात विमानतळासारखेचं रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण व सुशोभीकरण होणार
संगमनेर LIVE (अहमदनगर) | विमानाचा प्रवास हा सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर असल्याने अशा प्रवासाचा आनंद हा रेल्वे प्रवासात मिळावा हे स्वप्न देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे असून अमृत भारत रेल्वे योजने अंतर्गत हे स्वप्न लवकरच देशवासीयांच्या पूर्ण होणार असल्याचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
ते अहमदनगर येथे अमृत भारत योजनेच्या पायाभरणी समारंभानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की रेल्वेतून प्रवास करणारा प्रवासी हा अत्यंत सामान्य असून, आर्थिक परिस्थिती मुळे अशा प्रवाशास प्रवासा दरम्यान अत्याधुनिक सुविधा मिळत नाही. स्वातंत्र्याचा अमृत कालखंड सुरू असून या कालखंडात भारतीय रेल्वेचा कायापालट करून सर्वसामान्य प्रवाशास अत्याधुनिक सुविधा ह्या प्रवासात तसेच स्थानकावर मिळाव्यात या करिता आज पंतप्रधान मोदी यांचे हस्ते अमृत भारत योजनेंतर्गत देशातील ५०८ ग्रामीण, शहरी रेल्वे स्थानकात पायाभरणी केली.
येणाऱ्या काळात ग्रामीण तसेच शहरी भागातील रेल्वे स्थानक हे अद्यावत तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे असतील. ज्या पध्दतीने देशातील विमानतळाचा विस्तार आणि सुशोभीकरण करण्यात आले तसेच आता रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
अहमदनगर ते पुणे इंटरसिटी अशी रेल्वे लवकरच सुरू होणार असून बाकीच्या इतर रेल्वेच्या वाढीव फेऱ्या बाबत ही लवकरच सकारात्मक निर्णय होईल असे याप्रसंगी सांगितले.
दरम्यान या पायाभरणी समारंभास भाजपचे दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, नगर शहराचे जिल्हाध्यक्ष अभयजी आगरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारंभास नगर शहरातील शाळकरी विद्यार्थी, पालक, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.