◻️ जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांचे आवाहन
संगमनेर LIVE (अहमदनगर) | देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त 'मेरी माटी, मेरा देश' या अभियांनातर्गत “अमृत कलश यात्रा" १ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. यामध्ये सर्व गांवे, तालुका तसेच शहरी भागातुन मातीचे संकलन करुन सर्व मातीचे कलश जिल्हा स्तरावर एकत्र आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, सर्व नगरपालिकांचे मुख्यधिकारी, संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ यावेळी म्हणाले, “अमृत कलश यात्रे" दरम्यान शिक्षण विभागाने शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने गावागावात रॅली काढावी. गाव व शहरी भागात नागरीकांना पंचप्राण शपथ देण्याचे नियोजन करावे. अमृत कलश यात्रे दरम्यान मातीचा कलश सन्मानपूर्वक शहरी भागात आणावा. या यात्रेला उत्सवाचे स्वरुप देऊन प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत होईल या पध्दतीने नियोजन करुन अमृत कलश यात्रा यशस्वी करावी. अशा सूचना त्यांनी दिल्यात.
दरम्यान अमृत कलश यात्रा उपक्रमातंर्गत जिल्हापरिषद, ग्रामपंचायत, शिक्षण विभाग, नगरपालिका, महानगरपालिका आदि विभागांच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात नियोजन करुन हा उपक्रम यशस्वी करावा. असे त्यांनी यावेळी सांगितले.