◻️ सारोळा कासार येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन
◻️ १३०० पेक्षा जास्त लाभार्थीना विविध विभागाचे अत्यावश्यक दाखले, कूपन, डोल यांचे वाटप
संगमनेर LIVE (सारोळा) | पावसा अभावी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती मोठ्या प्रमाणावर असून या काळात तुम्हाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही, तुमच्या पाण्याची, चाऱ्याची, रोजगाराची जवाबदारी पालक म्हणून आमची असेल असे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले ते सारोळा येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते.
सारोळा कासार ता. नगर येथे शासन आपल्यादारी उपक्रमाअंतर्गत लाभ वितरण मेळ्यावाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्याव्यास जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना खा. डॉ. विखे पाटील म्हणाले की, अत्यल्प पावसामुळे आपल्या जिल्ह्यास गंभीर दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. शेतात पीक नाही, हाताला काम नाही, पिण्याला पाणी नाही अशा परिस्थितीत विखे पाटील कुटुंब जिल्हा वासियांना वाऱ्यावर सोडणार नाही तर त्यांचे पालक म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा विश्वास व्यक्त केला. जिल्ह्यासाठी विखे पाटील कुटुंब हे मागील पन्नास वर्षांपासून सदैव कार्यरत आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या आदर्शवर आम्ही आमची वाटचाल करत आहोत. शासन आपल्या दारी या अभियानातून गरजूंना कुठलीही लाच न देता कूपन, डोल, तसेच अत्यावश्यक कागदपत्रे देत असून मागील काळात याच कामासाठी हजारो रुपये खर्च करून चकरा माराव्या लागल्या असत्या असे यावेळी त्यांनी सांगितले. मात्र नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून गोर गरीब जनतेला हे त्यांच्या दारी मिळत आहे असे सांगून मागील चार वर्षाच्या काळात खासदार कशा पद्धतीने काम करू शकतो, केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनां कशा पद्धतीने आपल्या भागात आणु शकतो हे माझ्या कामातून मी दाखवल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
यावेळी शिवाजी कर्डिले यांचेही समायोचित भाषण झाले. या कार्यक्रमात १३०० पेक्षा जास्त लाभार्थीना विविध विभागाचे अत्यावश्यक असलेले दाखले, कूपन, डोल याचे वाटप करण्यात आले.
दरम्यान यावेळी राहुल शिंदे, संजय गिरवले, भोर गुरुजी, प्रा. दळवी, लोकनियुक्त सरपंच सौ. आरती कडूस, दीपक कार्ले, छबुराव कांडेकर, सर्जेराव घाडगे, राजेंद्र आंबेकर, प्रतीक शेळके, सुधीर भोपकर, लक्ष्मण ढोकळ, अनिल आंधळे, प्रशांत गाहिले, संजय धामणे, रवींद्र कडूस, शासकीय अधिकारी तसेच लाभार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.