◻️ जयहिंद लोक चळवळीला ग्लोबल स्वरूप - आमदार थोरात
संगमनेर LlVE | निरोगी समाज निर्मिती बरोबर शिक्षण, कृषी ,आरोग्य या क्षेत्रात सातत्यपूर्ण काम करणाऱ्या जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून राज्यभरातील तरुण शेतकऱ्यांना कृषी व्यवसायासाठी दिले जाणारे प्रोत्साहन हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी काढले आहे. तर जयहिंद लोकचळवळीला आता ग्लोबल स्वरूप आले असल्याचे प्रतिपादन जयहिंदचे मार्गदर्शक विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे जयहिंद लोकचळवळीच्या वतीने चौथ्या युवा शेतकरी पुरस्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा. कृषी व महसूल तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हे होते. तर व्यासपीठावर जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक मा. आ. डॉ सुधीर तांबे, युवा आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, डॉ अभयसिंह जोंधळे उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. धनंजय मुंडे म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सहा वर्ष अत्यंत यशस्वीपणे कृषी मंत्री पद सांभाळले असून त्यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळत आहे. कृषी विभाग हा खऱ्या अर्थाने राज्याला पुढे नेणार असून आगामी काळात शेतकऱ्यांनी आपली उत्पादन क्षमता वाढवावी. याचबरोबर या उत्पादन वाढीतील २५ टक्के खर्च कमी करण्यासाठी राज्याचा कृषी विभाग प्रयत्न करणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती निर्माण होणार आहे.
शेती परवडत नाही. परंतु आपण परंपरा म्हणून शेती करत असतो. मात्र शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय म्हणून स्वीकारला तर तरुण नक्कीच यशस्वी होतील. यासाठी विद्यापीठांचे मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरणार आहे.
आमदार थोरात म्हणाले की, जयहिंद लोकचळवळ ही सकारात्मक विचार घेऊन समाजात परिवर्तन घडवण्यासाठी काम करत आहे. जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था मोडकळीस आले असताना भारताची अर्थव्यवस्था मात्र टिकून राहते. याचे कारण शेती व्यवसाय आहे. कारण आपली अर्थव्यवस्था ही शेतीशी निगडित आहे.
शेती हा आपण धर्म म्हणून पाहतो. आपल्या महसूल मंत्री पदाच्या काळात ही पिक पाहणी हा उपक्रम पीक नोंदणीसाठी राबविला गेला असून तो देशासाठी दिशादर्शक ठरणारा झाला आहे. जयहिंदने सातत्याने विविध क्षेत्रातील लोकांना प्रोत्साहन दिले असून ही लोकचळवळ आता ग्लोबल ठरत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त जय हिंद ची चौथी ग्लोबल कॉन्फरन्स मुंबईत होत असून या निमित्ताने जगभरातील विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या दिगज्यांचा संवाद तरुणांशी होत आहे.
यावेळी शेतकरी श्रद्धा धवन ढोरमले, सचिन होळकर यांनीही आपली मनोगत व्यक्त केली.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे यांनी केले तर आमदार सत्यजित तांबे यांनी आभार मानले.