संगमनेरच्या सहकार मॉडेलची नाबार्ड करून प्रशंसा
◻️ ग्रामीण समृद्धीचा संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक
◻️ ६० अधिकाऱ्यांच्या अभ्यास गटाकडून अमृत उद्योग समूह व सहकारी संस्थांना भेटी
संगमनेर LIVE | पर्जन्य छायेचा प्रदेश असल्याने सातत्यपूर्ण दुष्काळ, पाण्याची कमतरता असतानाही काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थांच्या माध्यमातून साधलेला ग्रामीण विकास आणि संगमनेर तालुक्यातील सामाजिक, आर्थिक ,औद्योगिक, आणि शैक्षणिक प्रगती या सहकारातून साधलेल्या विकास मॉडेलची नाबार्डच्या अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली आहे.
नाबार्ड बँकेच्या मुंबई विभागीय शाखेतील ६० अधिकाऱ्यांचा अभ्यास गटाने शनिवार व रविवार दोन दिवस अमृत उद्योग समूहाच्या व सहकारी संस्थांना भेटी दिल्या यावेळी मुंबई मुख्यालयाचे डेप्युटी जनरल मॅनेजर राकेश सिंग, विजय तिरूमला, मंगला श्रॉफ, वंदना वेणुगोपाल, गीता यादव, विवेक खानोलकर यांचा ६० अधिकाऱ्यांचा समावेश होता.
या अभ्यास दौऱ्यात त्यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, जोर्वे येथील दूध संस्था दूध संकलन केंद्र अहमदनगर जिल्हा बँक शाखा पतसंस्था यांसह संगमनेर मधील विविध सहकारी व शैक्षणिक संस्थांना भेटी दिल्या.
कारखाना येथे झालेल्या समारोप कार्यक्रमात राजेश सिंग म्हणाले की, ग्रामीण भागातील हा सहकार अनुभवणे हा एक अद्भुत अनुभव आहे. अनेक अधिकारी एसी कार्यालयात बसून सहकार क्षेत्राचे कामकाज पाहतात. मात्र सहकार भूमीत येऊन सहकारी संस्थांचे काम कसे चालते हे पाहण्यासाठी संगमनेर हे मॉडेल आहे. या अमृत उद्योग समूहाने शेतकरी सर्वसामान्य नागरिक यांच्या जीवनात मोठी प्रगती साधली असून संगमनेरचा हा पॅटर्न देशासाठी दिशादर्शक ठरणार आहे. अशा सहकारी संस्थांना नाबार्ड बँकेने सहकार्य केल्यास देशाच्या विकास खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर संगमनेरच्या सहकाराचे कामकाज चालत आहे. अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या विकासात जसे थोरात परिवाराचे तीन पिढ्यांचे योगदान आहे. तसेच नाबार्डचा ही अप्रत्यक्षरीत्या खूप मोठा वाटा आहे. नाबार्ड व जिल्हा सहकारी बँकेने सातत्याने वेळोवेळी मदत केली आहे . नदीपात्रातून पाणी उचलण्यासाठी विविध सहकारी संस्थांना नाबार्डची मोठी मदत झाली आहे.
अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांनी आपले सहकाराचे सशक्त जाळे निर्माण करताना अल्पभूधारक शेतकऱ्यांना रोजी रोटी पुरवली आहे. याचबरोबर संगमनेर मध्ये दर्जेदार गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक संस्था निर्माण झाल्याने अनेक कुटुंबांमधून समृद्धी निर्माण झाली आहे. उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरवणारे निळवंडे धरण व कालवे अनेक दिवसांच्या अविश्रांत कामातून पूर्ण केल्याने निळवंडे चे पाणी दुष्काळी भागात आल्याचे समाधान असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक रावसाहेब वर्पे, गणपतराव सांगळे, संतोष हासे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, बापूसाहेब गिरी, सेक्रेटरी किरण कानवडे, डॉ. सुजित खिलारी, तालुका विकास अधिकारी अशोक थोरात आदींसह विविध अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.