स्वयंसिध्दा प्रदर्शनातून बचत गटांना आत्मविश्वास मिळाला - सौ. विखे पाटील
◻️ जनसेवा फौडेशनच्या प्रदर्शनात महीला बचत गटांचा सहभाग
◻️ जनसेवेच्या माध्यमातून सहा तालुक्यातील १४६ गावामध्ये १६ हजार बचत गटांची स्थापना
◻️ पंचायत समितीच्या वतीने ४ कोटी ७६ लाख ८३ हजार रुपये कर्ज धनादेशाचे वितरण
संगमनेर LIVE (लोणी) | महीलांना बचत गटाच्या चळवळीतून सक्षम करून त्यांना व्यावसायिक ज्ञान देण्यासाठी जनसेवा फौडेशनने नेहमीच यशस्वी प्रयत्न केले आहेत. स्वयंसिध्दा यात्रेच्या माध्यमातून महीलांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केले.
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जनसेवा फाऊंडेशन, लोणी, पंचायत समिती, राहाता आणि कृषि विज्ञान केंद्र बाभळेश्वर, कृषि विभाग, पशुसंसंवर्धन विभाग, आत्मा अहमदनगर यांच्या वतीने आयोतित राहाता तालुकास्तरीय सक्षम महीला महोत्सव अर्थात स्वयंसिध्दा यात्रा २०२३ अंतर्गत महीला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुचे प्रदर्शन - विक्री, खाद्य महोत्सव, पशु - पक्षी प्रदर्शन शुभारंभ राज्याचे महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, रणरागिणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्री विखे पाटील, प्रवरा बॅकेचे उपाध्यक्ष मच्छिद्र थेटे, भाजपाच्या महीला जिल्हा अध्यक्ष कांचन मांढरे, तारा खालकर, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, आत्माचे प्रकल्प संचालक विलास नलगे, पशुसंवर्धन आयुक्त डाॅ.प्रशांत भट, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. दशरथ दिघे, पशुसंवर्धन अधिकारी डाॅ. सुनिल तुंबारे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालींदर पठारे, कृषि विज्ञान केंद्र, बाभळेश्वरचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख,तालुका कृषि अधिकारी आबासाहेब भोरे, जनसेवेचे सचिव डाॅ. हरिभाऊ आहेर, लोणी बुद्रुकच्या सरपंच कल्पना मैड, प्रकल्प संचालिका रूपाली लोढे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सौ. विखे पाटील म्हणाल्या, २०१३ पासून महीलांसाठी सुरु असलेला हा उपक्रम महीलांसाठी महत्वपूर्ण ठरत आहे. जनसेवेच्या माध्यमातून सहा तालुक्यामध्ये १४६ गावामध्ये १६ हजार बचत गटांची स्थापना करतानांच महीलांना वेळोवेळी विविध प्रशिक्षणातून व्यावसायिक धडे दिल्याने आज त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आज ग्रामीण महीलांचे सक्षमीकरण होत आहे. बचत गटांच्या वेगवेगळ्या व्यवसायामुळे महीलांच्या हाताला काम मिळत असून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून महीला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यास बचत गटांची चळवळ आणि स्वयंसिध्दा प्रदर्शन उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
विविध खाद्य पदार्थासह, सेंद्रीय भाजीपाला उत्पादन, फळ प्रक्रिया उत्पादन तंत्रज्ञान टाकाऊ पासून टिकाऊ अशा वस्तुची निमिर्ती गटाद्वारे होत असल्याने महीलांचा आत्मविश्वास वाढला आहे. महीलांनी बचत गटाद्वारे एकत्र येत सक्षम व्हावे. आपल्या साठी जनसेवा फौडेशनचे सहकार्य सदैव मिळत राहील असा विश्वास त्यांनी दिला.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील योनी महीला बचत गटांच्या उपक्रमाचे कौतुक करून इतर महीलांनी देखील याद्वारे व्यावसायिक दृष्टीकोने आत्मसात करण्याचे आवाहन केले. यावेळी विलास नलगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी प्रास्ताविकात स्वयंसिध्दा यात्रेचा आढावा घेतला. यावेळी पंचायत समितीच्या वतीने ४ कोटी ७६ लाख ८३ हजार रुपयांचे कर्जाच्या धनादेशाचे वितरण १६ बचत गटांना वितरीत करण्यात आले.
दरम्यान रानडुक्कर हल्लात नेवासा तालुक्यातील तामसवाडी येथील आरती रामकिसन भवर या मृत झाल्या होत्या त्यांचा वारस रामकिसन संभाजी भवर यांना तातडीची मद्दत म्हणून ५ लाखाचा धनादेश वनविभागाच्या वतीने सुपूर्त करण्यात आला.