वटसावित्री पौर्णिमेनिमित्त तालुक्यात २ हजार १२१ वटवृक्षांचे रोपण
◻️ दंडकारण्य अभियानांतर्गत १७१ गावे व २५८ वाड्याचा समावेश
संगमनेर LIVE | सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त संगमनेर २ हजार १२१ वटवृक्षाचे रोपण करण्यात आले असून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक महिलांवर देण्यात आली. या प्रत्येक देव वृक्षाचे संवर्धन गावकऱ्यांनी करावे असे आवाहन प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे यांनी केले आहे.
संगमनेर कारखाना कार्यस्थळावर अमृतेश्वर मंदिर येथे दंडकारण्य अभियानांतर्गत वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटवृक्ष रोपण अभियान सुरू करण्यात आले यावेळी प्रकल्प प्रमुख सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात, सौ. अर्चना बालोडे, सौ. निर्मला गुंजाळ, सुनंदा जोर्वेकर, सौ. पद्मा थोरात, सौ. निर्मला राऊत, सौ. बेबी थोरात, सौ. प्रतिभा जोंधळे, सौ. अरुणा हिंगे, सौ. शितल उगलमुगले, सौ. सुनीता कांदळकर, प्राजक्ता घुले, सुरभी मोरे, नंदा कढणे, स्वाती राऊत, प्रीती फटांगरे, रोहिणी गुंजाळ, सुषमा भालेराव आदींसह विविध महिला उपस्थित होत्या.
यानंतर गणनिहाय महिलांनी ग्रुप करून गावोगावी भेट देत प्रत्येक गावात किमान पाच वटवृक्षांचे रोपण केले. संगमनेर तालुक्यातील १७१ गावे व २५८ वाड्यावर एकूण २ हजार १२१ वटवृक्षांचे रोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला मोठे महत्त्व आहे. वटपौर्णिमेनिमित्त वड या देववृक्षाचे पूजन केले जाते. वड हा दीर्घायुष्य असून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतो. अध्यात्मिक आणि शास्त्रीय असे दोन्ही कारण वट पूजेची असून दंडकारण्य अभियानांतर्गत मागील १६ वर्षापासून दरवर्षी आपण गावोगावी मोठे वृक्षारोपण करतो.
यामुळे संगमनेर तालुक्यात वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली असून उघडी बोडके डोंगर आता हिरवीगार दिसू लागली आहेत. घराबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवून प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन चळवळीत सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची नोंद ही आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आहे. पर्यावरण संवर्धन हे अत्यंत महत्त्वाचे आहे २०२० - २१ मध्ये आलेला कोरोना ने सर्वांना ऑक्सिजनचे महत्व कळाले आहे. वृक्ष ही ऑक्सिजन देत असून देव वृक्ष असलेला वड, पिंपळ, उंबर, कडुलिंब ही वृक्ष जास्त प्रमाणात ऑक्सिजन देतात. म्हणून यापुढे प्रत्येकाने किमान दोन वृक्षांचे रोपण करून त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले.
दरम्यान यावेळी पर्यावरण संवर्धनाची गीते गायली गेली.