पराभव झाला असला तरी खचून जावू नका - डॉ. सुजय विखे पाटील
◻️ निवडणूक निकालानंतर डाॅ. विखे पाटील यांचा पदाधिकरी आणि कार्यकर्त्याशी संवाद
◻️ महायुतीची ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून देण्याचे आवाहन
◻️ जिथे अन्याय होईल तिथे तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा
संगमनेर LIVE (नगर) | माझ्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून पळाला आहे. पराभव झाला असला तरी खचून जावू नका. आरोप प्रत्योरोपांमध्ये वेळ घालविण्यापेक्षा गावपातळीवर आजपासून कामाला सुरूवात करा. जिथे अन्याय होईल तिथे तुमच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे. महायुतीची ताकद विधानसभा निवडणुकीत दाखवून देण्यासाठी कटीबध्द व्हा असा संदेश डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिला.
निवडणूक निकालानंतर डाॅ. सुजय विखे पाटील यांनी महायुतीच्या सर्व पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केला. जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यासह लोकसभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वच कार्यकर्त्यानी डाॅ. विखे पाटील यांच्या नावाचा जयजयकार करून सभागृह डोक्यावर घेतले.
निवडणूक निकालाच्या विश्लेषणात न जाता आता पुन्हा नव्याने आपल्याला काम सुरू करायचे आहे. त्यामुळे परभवाने नाराज होवू नका असे भावनिक आवाहन करून डाॅ. विखे पाटील म्हणाले की, निवडणुकीत पराभव का झाला याची कारण फार वेगळी आहेत. पण तरीही सहा लाखांचे मतदान देवून जनतेन आपल्याला विश्वास दाखवला. यासाठी जे कार्यकर्ते पळाले त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही पराभव स्विकारला पण समोरच्यांना विजय पचवता येत नाही. पारनेरची घटना पाहाता आता यापुढे कोणाही कार्यकर्त्यावर हल्ला झाल्यास महायुतीच्या कार्यकर्त्यानी बांगड्या भरलेल्या नाहीत आशा शब्दात त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
लोकसभा मतदार संघातील प्रत्येक गावात आपण निधी दिला आहे. विकास काम पूर्ण कशी होतील याचा पाठपुरावा करा यासाठी थेट संपर्क साधा. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. विकास कामांना मोठी मदत होणार आहे. नगरच्या औद्योगिक वसाहतीचे काम महीनाभरात सुरू होईल जी आश्वासन दिली त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कटीबध्द राहणार असून कुठेही कमी पडणार नाही. कोणी काही चर्चा केल्यातरी २०२९ चा खासदार महायुतीचाच असेल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची ताकद विरोधकांना दाखवून देण्याचे आवाहन डाॅ. विखे पाटील यांनी केले.
जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांनी आपल्या भाषणात डॉ. विखे यांच्या पराभवाची कारण खूप वेगळी आहे. त्याचे विश्लेषण समोर आले आहे. काही गोष्टीचा खोटा प्रचार करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. पराभवाचे दुख असले तरी नाउमेद न होता सर्वानी एकसंघपणे पुन्हा कार्यरत राहाण्याचे आवाहन त्यांनी केले.
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान होण्याची संधी मिळाली याबाबत डाॅ. सुजय विखे पाटील यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावाला सर्वानीच घोषणा आणि टाळ्या वाजवून अनुमोदन दिले.