“माझ्या मैतीला नाही पण, दशक्रिया विधीला गाडी आणा”
◻️ फायनान्स कंपनीच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या
◻️ कनोली येथील घटना ; आश्वी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
संगमनेर LIVE (आश्वी) | पाच महिन्यांपूर्वी फायनान्स वर घेतलेल्या दुचाकी गाडीचा हप्ता भरण्यासाठी फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या त्रासाला वैतागून संगमनेर तालुक्यातील कनोली येथील दीपक दादाभाऊ बलसाने (वय - ३५) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मयत दीपक बलसाने या तरुणाने पाच महिन्यांपूर्वी आकाश बाळासाहेब लाहुंडे (रा. धांदरफळ) यांच्या नावावर हिरो कंपनीची दुचाकी घेतली होती. या दुचाकीवर फायनान्स कंपनीचे कर्ज होते. त्यामुळे हा तरुण नेहमी तणावाखाली राहत होता. महिन्याला तीन हजार रुपये हप्ता भरत होता. ९० हजार पाचशे रुपये रोख स्वरूपात देऊनही फायनान्स कंपनीचे शेखर पवार आणि मॅनेजर गणेश गाडेकर हे त्रास देत होते.
त्यामुळे वैतागून दीपक दादाभाऊ बलसाने या तरुणाने शुक्रवार दि. ५ जूलै २०२४ रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेतला. ही माहिती मिळताच गावातील दिलीप वर्पे, गौरव जगताप, भागवत बलसाने, हर्षल बससाने यांच्या मदतीने भाऊ सचिन बलसाने यांनी दीपकचा मृतदेह खाली घेतला. त्यावेळी दीपकच्या खिशात एक चिठ्ठी सापडली.
त्या चिठ्ठीत लिहिले होते की, “शेखर व त्यांचे साहेब गाडी घेऊन गोड बोलले व पैसे घेतल्यानंतर वेगळे बोलायला लागले. माझ्या मैतीला नाही पण, दशक्रिया विधीला गाडी आणा. ते एजंट पैसे परत देत नव्हते. तसेच ९० हजार पाचशे रुपये दिले होते. त्यामुळे कंटाळून फाशी घेत असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे.
दरम्यान सचिन बलसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाणे येथे फायनान्स कंपनीचे शेखर दत्तात्रय पवार आणि गणेश शरद गाडेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.