मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजनेसाठी ७ लक्ष महिलांचे ऑनलाईन अर्ज
◻️ नगर येथे प्राप्त अर्जाच्या छानणीसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना
◻️ प्रभारी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची छानणी कक्षास भेट
संगमनेर LIVE (अहमदनगर) | महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा होण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री - माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावाणी करण्यात येत असुन आजपर्यंत ७ लक्ष महिला लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन भरुन घेण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात मुख्यमंत्री - लाडकी बहिण योजनेची गतीने अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा परिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय विशेष मोहिम राबविण्यात आली. तसेच या मोहिमेचा दैनंदिन आढावा, तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या सुनियोजन कामामुळे ७ लक्ष महिलांचे अर्ज भरुन घेण्यात यश प्राप्त झाले आहे.
प्राप्त अर्जाच्या छानणीसाठी विशेष मोहिम..
मुख्यमंत्री - लाडकी बहिण योजनेसाठी प्राप्त झालेल्या महिलांच्या अर्जाची छानणी जलदगतीने व्हावी यादृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुकास्तरावर तहसिलदार, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र कक्ष सुरु करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार तालुकास्तरावर स्वतंत्र अशा छानणी कक्षाची स्थापना करण्यात आली असुन दोन-तीन शिफ्टमध्ये सर्व कर्मचारी या कक्षातुन अर्जांच्या छानणीचे काम युद्धपातळीवर करत आहेत.
छानणी कक्षास प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट..
मुख्यमंत्री - लाडकी बहिण योजनेसाठी प्राप्त झालेल्या महिलांच्या अर्जाची छानणीसाठी स्वतंत्रपणे सुरु केलेल्या अहमदनगर तालुक्यातील छानणी कक्षास प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी प्रत्यक्ष भेट देत पहाणी केली.
या योजनेंतर्गत आजपर्यंत एकुण ४३ हजार ७११ पात्र लाभार्थ्यांना पोर्टलवर मान्यता देण्यात आली असुन या योजनेचा अधिकाधिक लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे येरेकर यांनी आवाहन केले आहे. तसेच योजनेशी संबंधित सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.