उद्योगपती रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न द्या - ना. रामदास आठवले
◻️ पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने मानवतेचा सागर आणि गरीब गरजूंचा कैवारी हरपला
संगमनेर LIVE (मुंबई) | उद्योग विश्वातील भारताचे कोहिनूर, टाटा सुमूहाचे प्रमुख, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशाची औद्योगिक व सामाजिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. रतन टाटा हे एक व्यक्ती नसून देशवासीयांना प्रेरणा देणारा विचार होते.
उद्योगक्षेत्रात विश्वविजयी ठरलेले रतन टाटा हे साधी राहाणी आणि उच्च विचार जगलेले आदरणीय अवलिया व्यक्तिमत्व होते. ते करुणेचा आणि मानवतेचा महासागर होते. रतन टाटा यांच्या निधनाने गोरगरिबांचा गरजवंतांचा कैवारी हरपला आहे. अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
देशात औद्योगिक क्रांती करणारे उद्योग विश्वातील कोहिनूर रतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा अशी आपल्यासह कोट्यवधी जनतेची मागणी आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार कडे रतन टाटा यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.
पद्मविभूषण रतन टाटा यांनी उद्योगक्षेत्रात केलेली कामगिरी ही हिमालया सरखी उंच आहे. लाखो लोकांना रोजगार देणारे रतन टाटा हे कामगाराचा आदर करीत असत. त्यांच्याशी माझे खूप चांगले संबंध होते. असे ना. रामदास आठवले म्हणाले.
जगात रतन टाटा यांनी आपल्या देशाचे नाव उद्योग क्षेत्रात उज्ज्वल केले आहे. उद्योग क्षेत्रात प्रचंड यशस्वी होऊन ही त्यांनी कधीही आपली गर्भश्रीमंती चा देखावा मांडला नाही. त्यांचे कर्तुत्व उंच आकाशाला भिडले असले तरी ते कायम जमिनीवर राहिले. सामान्य माणसांचा त्यांनी कायम मान राखत सर्वांशी समतेने वागले.
आपल्या उत्पन्नाचा ६५ टक्के वाटा त्यांनी गोरगरिबांच्या देशाच्या समाजाच्या हितासाठी दान केला. मुंबईत परेल मधील टाटा हॉस्पिटल हे कर्क रुग्णांना वरदान ठरले आहे. देशभरातील गरीब रुग्णांना जीवदान देणारे अनमोल वैद्यकीय मदत देणारे रुग्णालय आहे. रतन टाटांनी उद्योग क्षेत्रा सोबत देशासाठी आणि समाजासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
दरम्यान त्यांच्या सारखा करूणाशील महान उद्योजक पुन्हा होणार नाही. त्यांना देशभरातील रिपब्लीकन पक्षाच्या वतीने कोट्यवधी आंबेडकरी रिपब्लिकन कार्यकर्त्यांकडून श्रध्दांजली अशी शोकभावना ना. आठवले यांनी व्यक्त केली आहे.