चांगल्या समाज निर्मितीसाठी पत्रकारांचे योगदान महत्त्वाचे - बाळासाहेब थोरात
◻️ अमृत उद्योग समूहाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकाराचा सन्मान
◻️ पत्रकारांना सत्याच्या पाठीशी उभे राहण्याचे माजी मंत्री थोरात यांचे आवाहन
संगमनेर LIVE | काळानुसार पत्रकारितेमध्ये अनेक माध्यमे आली आहे. परंतु आपली बातमी सत्य व गुणवत्तेची व विश्वासाची व्हावी यासाठी प्रत्येकाने काम केले पाहिजे. याचबरोबर लपणारे असत्य बाहेर काढण्या सोबतच सत्य घटनांच्या पाठीशी पत्रकारांनी असावे असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी ग्रहावर अमृत उद्योग समूहाच्या वतीने आयोजित पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी समवेत युवा काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात व संगमनेर जेष्ठ व तरुण पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तसेच विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार थोरात म्हणाले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील चांगल्या घटनांबाबत तो मार्गदर्शन करतो. तर वाईट घटनांवर टीका करतो. आणि त्यातून सुधारणा होते. बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या दर्पण लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या केसरी या वृत्तपत्रांनी क्रांती घडून आणली. काळानुरूप अनेक माध्यमे आली परंतु प्रिंट मीडियाचे महत्त्व आजही आहे. इलेक्ट्रॉनिक चॅनेल सह आता नव्याने सोशल मीडिया जास्त वापरला जातो आहे. मुक्त पत्रकारिता आली आहे . इतर क्षेत्रांप्रमाणे पत्रकारिता क्षेत्रांमध्ये सुद्धा जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. परंतु प्रत्येक पत्रकाराने नेहमी सत्य घटनांच्या पाठीशी राहिले पाहिजे
असत्य नेहमी लपण्याचा प्रयत्न करते. त्यालाही जनतेसमोर उघडे करावे आणि सत्य बाहेर येण्यासाठी धडपड करते त्याला पाठिंबा द्यावा यासाठी प्रत्येकाने गुणवत्तेने काम करावे.
सोशल मीडिया मधून अनेक जण व्यक्त होताना दिसतात. असत्याचा गदारोळ सगळीकडे झाले आहे. मात्र त्यातही सत्यता शोधली पाहिजे आणि त्याला न्याय दिला पाहिजे हे काम पत्रकारांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, पत्रकारांच्या जीवनामध्ये धावपळ खूप आहे. म्हणून प्रत्येकानं स्वतःच्या आरोग्याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. अनेक जण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यातून स्वतः व परिवाराची ही हानी होते म्हणून चांगल्या कामाबरोबर चांगले आरोग्य राहण्यासाठी ही प्रत्येकाने वेळ द्यावा असे आवाहन केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ यांनी केले.