जनाधार गमावलेल्या राहूल गांधीनी विधान करताना भान ठेवावे - मंत्री विखे पाटील
◻️ राहुल गांधी यांच्या शिर्डीमध्ये ७ हजार मतदार वाढल्याच्या आरोपाचे काढले वाभाडे
◻️ शिर्डीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात कोबिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना जेरबंद करण्याच्या दिल्या सूचना
संगमनेर LIVE (राहाता) | कोणतेही विधान करताना राहूल गांधी यांनी भान ठेवले पाहीजे. शिर्डीतील मतदार संख्येचा जावई शोध त्यांनी कुठुन लावला हाच खरा प्रश्न आहे. जनाधार गमावलेले नेते आता चुकीची विधान करून जनतेसमोर येण्याचा प्रयत्न करीत असल्याचा टोला जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.
राहूल गांधी यांनी शिर्डी मतदारसंघाच्या बाबतीत केलेल्या विधानावर माध्यमांशी बोलतांना विखे पाटील म्हणाले की, राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या जनादेशाचे खरे दुख त्यांना आहे. जिल्ह्यातही सामान्य लोकांनी प्रस्थापितांना घरी बसवले याचा विसर राहूल गांधी यांना पडला असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.
ज्यांचा पराभव झाला त्यांनीच राहूल गांधी यांना चुकीची माहीती पुरवली का या प्रश्नावर बोलतांना विखे पाटील म्हणाले की, आपल्या अस्तित्वाच्या लढाईसाठी धडपड करीत आहेत. मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुतीचेच वर्चस्व राहील विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिर्डी मध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना अत्यंत दुर्दैवी असून, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर उपाय योजना करण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुखांना सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढील आठवड्यात शहरात पुन्हा एकदा कोबिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाने पावल उचलावीत. आजच्या घटनेत पोलीसांचा हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावरही कारवाई करण्याबाबत आदेश दिले असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान सांयकाळी उशिरा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि वरीष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, संस्थानचे गोरक्ष गाडीलकर, अतिरीक्त पोलीस अधिक्षक वैभव कलबुर्गे, पोलीस उपअधिक्षक वमने, पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिष दिघे, कैलास कोते, विजय जगताप, कमलाकर कोते, सचिन शिंदे, नितीन कोते आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.
ग्रामस्थांचे म्हणणे जाणून घेत स्थानिक पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या चुकांचाही आढावा घेण्यात आला. शहरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय छुप्या पध्दतीने सुरू असून याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली.
शहरातील पाॅलिश वाल्यावर तसेच रात्री उशिरा पर्यत शहरात फिरणार्यावर कारवाई बेकायदेशीर सुरू असलेल्या रिक्षांच्या कागदपत्रांची तपासणी करावी. स्थानिक पदाधिकऱ्यानी अवैध धंद्याची माहीती गोपनिय माहीती पोलीस उपअधिक्षकांकडे द्यावी.
दरम्यान मंदीर परीसरातील सुरक्षेसाठी असलेले पोलीस आता शहराच्या सुरक्षेसाठी वापरावेत. संस्थानने आता त्यांच्या परीसराची सुरक्षा यंत्रणा वापरण्याच्या सूचना ना. विखे पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याना दिल्या.
लोकसभेचे विरोधीपक्षनेते खासदार राहुल गांधी सभागृहात काय म्हणाले होते?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान, हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतके लोक महाराष्ट्राच्या मतदान यादीत समाविष्ट झाले आहेत. जवळपास ७० लाख नवीन मतदारा अचानक वाढल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. महाराष्ट्रात पाच वर्षांत जेवढे मतदार जोडले गेले त्यापेक्षा पाच महिन्यांत जास्त मतदार जोडले गेले आहेत.
यावेळी त्यांनी शिर्डीचे उदाहरण दिले. शिर्डीमध्ये एका ठिकाणी ७ हजार मतदार वाढले आहेत. विशेष म्हणजे नवीन मतदार हे भाजपला ज्या ठिकाणी आघाडी मिळाली आहे, त्या ठिकाणी जोडण्यात आले आहेत. असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी करुन निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकीची आकडेवारी देण्याची मागणी केली.