बाळासाहेब थोरात हे अविरतपणे काम करणारे लोकनेते - डॉ. तारा भवाळकर
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना ‘सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
संगमनेर LIVE | सहकारामुळेच ग्रामीण भागामध्ये शिक्षण आणि उद्योग पोहोचले असून त्यामुळे महाराष्ट्राची भरभराट झाली आहे. जुन्या पिढीने कर्तृत्वातून सहकार निर्माण केला .त्या पिढीच्या किर्तीप्रमाणे कृती करणारे महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व बाळासाहेब थोरात हे सहकाराबरोबरच सर्वसामान्यांच्या विकासासाठी अविरतपणे काम करणारे लोकनेते असल्याचे गौरवोद्गार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ तारा भवाळकर यांनी काढले.
सांगली येथील भावे नाट्यगृह येथे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील होते. व्यासपीठावर माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, सांगली काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा ट्रस्टचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विक्रम सावंत, डॉ. दयानंद नाईक, आप्पासाहेब पाटील, नेताजीराव पाटील, डॉ. लताताई देशपांडे, बाबासाहेब ओहोळ, विक्रम पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बाळासाहेब थोरात यांचा सन्मानचिन्ह, शाल बुके व २५ हजार रुपये रोख पुरस्कार देऊन शानदार कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. साहित्यिक व माध्यमे यांनी परखडपणे आपले मत मांडले पाहिजे. कारण त्याचा समाज मनावर परिणाम होतो. कुठल्याही क्षेत्रात काम करताना नैतिकता ठेवली पाहिजे. सहकारामध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी नैतिकेचा आदर्श दिला. तोच वारसा घेऊन बाळासाहेब थोरात काम करत असल्याने संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला आहे. साहित्य, समाजकारण, राजकारण, शेती, दुग्ध व्यवसाय आणि ग्रामीण विकास यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी केलेले काम हे दिशादर्शक आहे.
सहकार हा सर्वसामान्यांच्या विकासासाठी असून जुन्या पिढीतील कर्तुत्वान व्यक्तींनी सहकार उभा केला. अनेक ठिकाणी तो मोडकळीस आला आहे. मात्र बाळासाहेब थोरात यांच्यासह विविध सहकाऱ्यांनी जुन्या पिढीतील कीर्तीवंतांच्या विचारांना कृतीतून जोड दिल्याने समृद्ध सहकार वाढला असल्याचे भवाळकर म्हणाल्या.
जयंत पाटील म्हणाले, साहित्य विचार करायला लावते. गांधीजींनी सर्वधर्मसमभाव देशांमध्ये रुजवला मात्र आता तो कमी होत आहे. मनभेद निर्माण केला जात आहे. देशाचे पुढील भवितव्य चिंताजनक असून आर्थिक परिस्थिती ही काळजी करण्यासारखी असल्याचे ते म्हणाले.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांना २५ वर्षांपूर्वी या पुरस्काराने गौरवले होते. तोच पुरस्कार पुन्हा आपल्याला मिळाल्याने हा आनंद व योगायोग आहे. यशवंतराव चव्हाण यांनी कृषी औद्योगिक क्रांती घडून आणली आणि त्यातून सहकार चळवळ उभी राहिली. त्यांनी कार्यकर्त्यांना मोठी ताकद दिली.
तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांचा विचार घेऊन आपण सहकारात प्रामाणिकपणे व चांगला हेतू ठेवून काम केल्याने संगमनेरचा सहकार फुलला आहे. या सहकार चळवळीमुळे संगमनेर तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली असून शहरातील बाजारपेठ फुलली आहे.
दिल्लीच्या साहित्य संमेलनात तारा भवाळकर यांनी अत्यंत स्पष्टपणे आपले विचार मांडले. लेखक आणि पुस्तक यांच्यामध्ये मोठी ताकद असून त्यांनी जगाचा भूगोल बदलला आहे. साहित्यिकांचा मोठा अधिकार असून त्यांनी राजकारताना जाब विचारला पाहिजे. लोकशाहीमध्ये मीडिया भयमुक्त असावा असेही ते म्हणाले.
डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, सहकारतीर्थ गुलाबराव पाटील यांचे सहकार व सांगली जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान आहे. डॉ. सदानंद मोरे म्हणाले की, महाराष्ट्र धर्मामध्ये सहकारचळवळ मोडत असून तिला आध्यात्मिक रूप आहे पंढरीची वारी सुद्धा सहकारच आहे. सहकार ही महाराष्ट्रातील जनतेची जीवननिष्ठा असून ही सहकार चळवळ सर्वांनी जपली पाहिजे असे ते म्हणाले.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक पृथ्वीराज पाटील यांनी केले. तर ऋतुराज पाटील यांनी आभार मानले. यावेळी सांगली जिल्ह्यातील सहकार साहित्य, राजकारण, शिक्षण, कृषी या विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्काराच्या रकमेत भर टाकून विद्यार्थ्याना डॉ. भवाळकर यांचे पुस्तके देणार..
पुस्तके ही माणसाला जगायला शिकवतात. लेखक आणि पुस्तकांमध्ये ताकद असून पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा जपण्यासाठी वाचन संस्कृती वाढवली पाहिजे. याकरता सहकार तीर्थ गुलाबराव पाटील पुरस्काराच्या रकमेमध्ये मी काही मदत टाकून डॉ. तारा भवाळकर यांची पुस्तके विविध विद्यालयांमधील विद्यार्थ्यांना देण्याची घोषणा बाळासाहेब थोरात यांनी केली. तर, हा स्तुत्य उपक्रम असल्याचे माजी गृहमंत्री आमदार जयंत पाटील यांनी म्हटले आहे.