निळवंडे आवर्तनातून पाझर तलाव आणि बंधारे भरून द्या - आमदार अमोल खताळ
◻️ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार अमोल खताळ यांचे निर्देश
संगमनेर LIVE | निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यांना सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे. डाव्या कालव्याचे पाणी राहता तालुक्यापर्यंत आणि उजव्या कालव्याचे पाणी राहुरी तालुक्यापर्यंत पोहोचले जाईल. त्यानंतर संगमनेर तालुक्यातील सर्व पाझर तलाव, छोटे मोठे बंधारे भरून घेण्याबाबत आपण जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
संगमनेर तालुक्यात सध्या पाणीटंचाई जाणवत आहे. म्हणून जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यांना उन्हाळी आवर्तन सुरू आहे. सदरचे आवर्तन हे ४० दिवसांसाठी राहणार असून हे पाणी दोन्ही कालव्यांच्या टेलपर्यंत पोहोचले पाहिजे या दृष्टीने जलसंपदा विभागाचा प्रयत्न सुरू आहे.
संगमनेर तालुक्यात सद्यस्थितीला पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे डावा आणि उजवा कालवा कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेत या आवर्तनातून आमच्या गावातील छोटे मोठे बंधारे व पाझर तलाव भरून देण्यात यावे अशी मागणी केली. या मागणीचा विचार करून तात्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन संगमनेर तालुक्यातील सर्व पाझर तलाव आणि साठवण बंधारे भरून घेण्यात यावेत असे सक्त निर्देश आपण दिले आहे.
जरी या आवर्तनाचा कालावधी कमी असला तरी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटिल यांच्याशी चर्चा करून या आवर्तनाचा कालावधी मागेपुढे करावा लागला तरी तो केला जाईल आणि तालुक्यातील सर्व छोटे मोठे बंधारे व इतर पाणीसाठवण्याचे ठिकाणे भरून घेतले जातील. याबाबत शेतकऱ्यानी अजिबात काळजी करू नये. तसेच जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही कालवा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशाही सूचना आमदार अमोल खताळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.