भारतीय सैन्याच्या शौर्यामुळे पाकीस्तानने भारतापुढे गुडघे टेकले - आ. अमोल खताळ
◻️ ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्यदलाचे समर्थनार्थ संगमनेर येथे तिरंगा रॅली
संगमनेर LIVE | जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी २७ निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला होता. त्या दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदल या तिन्ही दलाच्या सैनिकांना प्रोत्साहन दिले. म्हणून त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर देत चांगलाच धडा शिकवत ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. त्यामुळे भारताच्या तीनही सैन्यदलाच्या समर्थनार्थ आणि यांचे मनोबल वाढविण्यासाठी संगमनेर शहराच्या विविध भागातून विजयी तिरंगा मोटारसायकल रॅली काढून सैनिकाना मानवंदना देण्यात आली.
संगमनेर शहरातील नगरपालिकेच्या जवळील लालबहादूर शास्त्री चौकामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, महायुतीचे सर्व कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिक एकत्र आले. आमदार अमोल खताळ व त्यांच्या पत्नी सौ. नीलम खताळ यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दहशतवादी हल्ल्यामध्ये ठार झालेल्या पर्यटकांच्या तसेच हल्ल्यास प्रतिउत्तर देताना युद्धाच्यावेळी शहीद झालेल्या जवानांच्या प्रति श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
महाराष्ट्र गीताने या विजयी तिरंगा रॅलीला सुरुवात झाली. “भारत माता की जय” “वंदे मातरम“ अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आमदार अमोल खताळ यांच्यासह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोटरसायकलवर बसून या विजयी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करून आलेल्या या विजयी तिरंगा रॅलीची नवीन नगर रोडवरील प्रांताधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रगीताने सांगता झाली.
दरम्यान ही मोटार सायकल विजय तिरंगा रॅली शहरातील माळीवाडा, मेनरोड, दिल्ली नाका, नवघर गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बसस्थानक, नवीन अकोले रोड, बीएड कॉलेज रोड, श्रमिक मंगल कार्यालय, राहणे मळा, गणेश नगर, नाशिक रोड, जुना निमोण नाका, साई श्रद्धा चौक, तिरंगा चौक, मालदाड रोड शिवाजीनगर, जाणता राजा रोड मार्गे नवीन नगर रोडवरील प्रांताधिकारी कार्यालय येथे सांगता झाली.
देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी भारतीय लष्कर, वायू आणि नौदल या तीनही सैन्यदलाला प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांनी पाकिस्तानचे कंबरडे मोडले. त्यामुळे पाकीस्तानाला त्यांची लायकी दाखवून देण्यात यश आले. तसेच पाकीस्तानने इतर देशांची मध्यस्थी करून गुडघे टेकत युद्ध विरामाच्या दृष्टीने चर्चा करून भारतापुढे त्यांनी शरणागती पत्करली. पाकिस्तानशी युद्ध करताना जे भारतीय जवान शहीद झाले. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही. यापुढे पाकिस्ताने जर पुन्हा दहशतवादी हल्ला केला तर, त्यांना यापेक्षा ज्यास्त ताकदीने प्रतिउत्तर देण्यासाठी भारत सक्षम आहे. तसेच भारताच्या तीनही सैन्य दलाच्या शौर्यामुळे पाकीस्तानने भारतापुढे गुडघे टेकले. असे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांनी काढले.