कठीण परिस्थितीतून यश मिळवण्यासाठी ‘प्रकाशवाट’ पुस्तक मार्गदर्शक
◻️ बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सुधाकर जोशी यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रकाशन
◻️ मानसिक दृष्ट्या खचलेल्या महिलाचा सांभाळ करणाऱ्या नगर येथील धामणे दांपत्याचा गौरव
संगमनेर LIVE | प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक पुस्तक दडलेले असते. प्रत्येकाने जीवनात मागे वळून पाहताना आपले सिंहावलोकन केले पाहिजे. संघर्ष केल्याने यशाचे समाधान मिळत असून सुधाकर जोशी यांच्यावरील प्रकाशवाट हे पुस्तक सर्वासाठी कठीण प्रसंगातून यश मिळवण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. असा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
संगमनेर येथे अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांच्या जीवन कार्यावर डॉ. संतोष खेडलेकर यांनी लिहिलेल्या प्रकाशवाट या पुस्तकाच्या अनावर प्रसंगी बाळासाहेब थोरात बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. संजीवनी जोशी, श्रीमती प्रभावती जोशी, डॉ. जयश्रीताई थोरात, माऊली सेवा प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे आदी मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, संघर्ष केल्यानेच यशाची खरे समाधान मिळते. सुधाकर जोशी यांनी चांगल्या संस्कारातून एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अत्यंत प्रामाणिक सेवा दिली आहे. बँकिंग क्षेत्रात त्यांचे काम मोठे असून त्यांच्या जीवनातील अनुभवांचे प्रकाशवाट हे पुस्तक आहे. प्रत्येकाच्या जीवनात चढ-उतार असतात परंतु संघर्षातून पुढे आल्यानंतर जीवनाचा खरा आनंद मिळतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक कथा दडलेली असून यशस्वी तेसाठी प्रत्येकाने जीवनाचे सिंहावलोकन करावे. असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये डॉ. संतोष खेडलेकर यांचे मोठे योगदान असून सुधाकर जोशी हे एक कर्तबगार अधिकारी आहेत. त्यांचा जीवन प्रवास हा नवीन पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, बँकिंग क्षेत्रात काम करताना सुधाकर जोशी यांनी अनेक माणसे जोडली. प्रत्येकाने आपल्या जीवनाचा इतिहास लिहावा अशी प्रेरणा या पुस्तकातून मिळणार आहे. जगातील राजकारण हे सध्या प्रोपोंगडावर चालत असून संगमनेरात मात्र सत्य चालणारी संस्कृती लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी रुजवली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, डॉक्टर संतोष खेडलेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. तर, सुधाकर जोशी यांनी सर्वाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी संगमनेर डाक विभागाचे अमोल गवांदे यांच्या उपस्थितीमध्ये पोस्टाच्या तिकिटाच्या आवरण करण्यात आले
दरम्यान या कार्यक्रमाचे स्वागत विष्णुपंत रहाटळ यांनी केले. प्रास्ताविक डॉ. संतोष खेडलेकर यांनी केले. तर, अमेय जोशी यांनी आभार मानले. याप्रसंगी दोन्ही परिवारावर प्रेम करणारा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
डॉ. राजेंद्र धामणे यांचे मानवतेचे मोठे कार्य..
समाजातील मानसिक दृष्ट्या खचलेल्या महिला भगिनींचा महिला बहिणींचा सांभाळ करण्याचे मोठे काम डॉ. राजेंद्र धामणे व सौ. सुचिता धामणे हे करत असून हे खरे मानवतेचे कार्य आहे. असे काम करणे अत्यंत सेवाभावी असून ही खरी परमेश्वराची सेवा होत असल्याची लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असेल या दांपत्याचे अभिनंदन केले आहे.
संगमनेरचा इतिहास अत्यंत निरपेक्षपणे लिहिणारे संतोष खेडलेकर हे लेखक व साहित्यिक असून समाजाचे अभ्यासक आहेत. लोकनाट्य क्षेत्रातही त्यांनी मोठे संशोधन केले असून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. संगमनेरच्या साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.