३०० वर्षानंतर महिला सबलिकरणाला गती - अॅड. शाळीग्राम होडगर
◻️ आश्वी बुद्रुक येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी
◻️ महिला लेझीम पथकासह घोड्यावर स्वार असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा पोशाखातील मुलीनी वेधले लक्ष
संगमनेर LIVE | ३०० वर्षानंतर राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री मंडळाची बैठक चौंडी गावात घेण्यात आली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची सृष्टी निर्माण करण्यासाठी सरकारने ६८० कोटी रुपये निधी मंजूर केला. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून अहिल्यानगर केले आणि होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला देखील अहिल्यादेवी यांचे नाव देण्यात येणार आहे. ३०० वर्षानंतर या सर्व घडामोडी सुरू झाल्या असून अहिल्यादेवीच्या माध्यमातून सरकारकडून महिला सबलिकरणाचे कामाला गती मिळत असल्याचे गौरवोद्गार अॅड. शाळीग्राम होडगर यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना जेष्ठ मार्गदर्शन अॅड. शाळीग्राम होडगर बोलत होते. सुरवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. तसेच रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबीर सह विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अॅड. होडगर पुढे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यत नद्यावर हजारो घाट बांधले. बारा ज्योतिर्लिगाचा जिर्णोध्दार केला. देशात हजारो विहिरी आणि बारवाची निर्मिती केली. विशेष म्हणजे माणसाप्रमाणे पशु पक्ष्यांना देखील पाणी पिता यावे यासाठी या बारवाची व विहिरींची संरक्षणा करण्यात आली. त्याच्या या कार्यामुळे लोक त्यांना पुण्यश्लोक म्हणू लागले.
गावा गावात गायरान जमिनी, शेततळे, बियाणे बँक, हुंडा बंदी, अन्नछत्रे, वाटसरूसाठी पाणपोई, धर्मशाळा यांची त्यांनी सुरूवात आणि उभारणी केली. देशभरात हजारो मंदिरे आणि घाट बांधण्याबरोबरचं शेती नसलेल्या विणकर समाजासाठी त्यांनी वस्त्रोद्योगाची स्थापना केल्याचे सांगून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक चरित्र तरुण पिढीने वाचावे आणि प्रेरणा घ्यावी, असे आवाहन अॅड. होडगर यांनी केले.
याप्रसंगी बाळकृष्ण होडगर, संचालक विजय म्हसे, भाऊसाहेब जऱ्हाड, विजय हिंगे, रोहीणीताई निघुते, सरपंच नामदेव शिंदे, उपसरपंच बबनराव शिंदे, अजय ब्राम्हणे, अशोक जऱ्हाड, गिताराम गायकवाड, माधवराव गायकवाड, सुमतीलाल गांधी, अण्णासाहेब जऱ्हाड, भाऊसाहेब खेमनर, विनायक जऱ्हाड, जेष्ठ पत्रकार सिताराम चांडे, योगेशशेठ रातडीया, भाऊसाहेब ताजणे, राहुल जऱ्हाड, नामदेव होडगर, हरीभाऊ ताजणे, उद्योजक हर्षल खेमनर, बापूसाहेब खेमनर, प्रा. बिडगर, संजय गांधी यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान पारंपारिक वाद्यांच्या गजरात गावातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला लेझीम पथकासह घोड्यावर स्वार असलेल्या अहिल्यादेवीचा पोशाखातील तरुणीनी लक्ष वेधून घेतले. तर, या कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचलन उमेश खेमनर यांनी केले.
आज देशात महापुरुष आडचणीत आले आहेत. राजकारणाचा पोत बदलल्यामुळे समाजात धर्म आणि जातीला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जाती - धर्माच्या भिंती पुन्हा उभ्या राहु लागल्या आहेत. महापुरुष देखील समाजाने वाटून घेतले. मात्र, आश्वी गावातील विविध समाजातील नागरीकांनी याठिकाणी एकत्र हजेरी लावुन समंजसपणा दाखवून दिला. याबाबत ग्रामस्थांचे अॅड. होडगर यांनी कौतुक केले. भगवान महावीर, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घ्या, असे आवाहन देखील त्यांनी शेवटी केले.