◻️ माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट
◻️ शिबलापुर येथे महावितरणच्या नवीन सब स्टेशनचे भुमीपुजन व बहिरोबा मंदिर सुशोभीकरण उद्घाटन
◻️ खळी, पिंप्री - लौकी अजमपुर, शिबलापूर येथे निळवंडे पाण्याचे जलपुजन
संगमनेर LIVE (अनिल शेळके) | “कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांची सहकार संपला तर, शेतकरी संपेल. त्यामुळे सहकारामध्ये कोणतेही राजकारण न आणता सहकार टिकला पाहिजे, अशी भावना होती. त्यांच्या या भावनेचा आदर करुन दोन्ही नेत्यांनी (संगमनेर आणि लोणी) हा निर्णय घेतला की, आपल्यात कितीही वाद असले तरी, या वादात सहकारी संस्था संपता कामा नये. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून दोन्ही कारखाने बिनविरोध केले.” असा गौप्यस्फोट माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. तर, इकडेही एक माजी व्यक्ती चेअरमन झाली आणि तिकडेही एक माजी व्यक्ती चेअरमन झाली. अशी मिश्किल टिप्पणी देखील केली.
संगमनेर तालुक्यातील खळी, पिंप्री - लौकी अजमपुर, शिबलापूर येथे निळवंडे पाण्याचे जलपुजन, तसेच शिबलापुर येथे महावितरणच्या नवीन सब स्टेशनचे भुमीपुजन व बहिरोबा मंदिर परिसर सुशोभीकरणाचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना हा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कार्यकर्ते ताबाजी मुन्तोडे होते.
कारखान्याचे माजी चेअरमन कैलास तांबे, जेष्ठ नेते भगवानराव इलग, जेहूर शेख, प्रा. कान्हू गिते, संचालक रतन कदम, रंगनाथ उंबरकर, अँड. अनिल भोसले, विजय म्हसे, अजय ब्राम्हणे, नारायण कहार, नानासाहेब शिंदे, गुलाबराव सांगळे, सरुनाथ उंबरकर, भाऊसाहेब जऱ्हाड, भाऊसाहेब गायकवाड, प्रकाश शिंदे, गोकुळ दिघे, मोहित गायकवाड, दिलिप मुन्तोडे, भाऊसाहेब सांगळे, भारत गिते, सतिष जोशी यांच्या सह पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि पंचक्रोशीतून आलेले विविध संस्थांचे पदाधिकारी व जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याआधी, खळी आणि पिंप्री - लौकी अजमपुर येथे झालेल्या सभेत डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, दर निवडणुकीत नेहमीच विरोधकांच्या बाजूने झुकणाऱ्या खळी गावाने यावेळी ३५० मतांची भक्कम आघाडी दिली. विकासाच्या मुद्द्यावर आधारित ही आघाडी म्हणजे जागरूक मतदारांचा कौल असल्याचे चित्र स्पष्ट झाले. “मतपरिवर्तन हे केवळ शक्यच नाही, तर ते विकासाच्या मार्गाने साध्य करता येते,” हे यातुन अधोरेखित झाले.
संगमनेरच्या आमदारासाठी फक्त सहा ठिकाणी घेतलेल्या प्रभावी सभा, मनात विश्वास निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्या. या निवडणुकीत संगमनेरच्या माजी आमदाराने विकासाची कामगिरी मांडण्याऐवजी नकारात्मक व खालच्या पातळीवर टिका केली. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत जनतेने नाकारलं. अशी बोचरी टिका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता करताना द्वेषाचे नव्हें तर, विकासाचे राजकारण करण्याचा सल्ला दिला. तसेच जोपर्यत ते (बाळासाहेब थोरात) माझं भावीचं स्वप्न पुर्ण करत नाही. तोपर्यत त्यांची (बाळासाहेब थोरात) गॅरंटी नाही, असा खोचक टोला देखील डॉ. सुजय विखे यांनी लगावला. तर, आमदार अमोल खताळ यांना विकास कामे करुन द्या, असे देखील म्हटले.
शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे विखे पाटील परिवार उभा असल्याचे सांगताना ते म्हणाले, येणाऱ्या काळात निळवंडे लाभक्षेत्रातील गावांना डीपी योजना, पाणीपुरवठा, शेतकऱ्यांसाठी उपाय योजना, रोजगारक्षम जोडधंदे या सर्व मुद्द्यांवर भक्कम पावले उचलण्यात येणार असून गावागावांमध्ये जनमानसांच्या भावनेवर विकासाची कामे केली जातील, अशी ग्वाही दिली.
सर्वसामान्यांच्या आशीर्वादावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना जलसंपदा खात्याची जबाबदारी मिळाली म्हणूनच आपल्याला “पाण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार नाही. पण, केवळ पाणी देऊन भागणार नाही. अत्याधुनिक शेती, प्रक्रिया उद्योग, युवा उद्योजकता यासाठी आता सर्वांनी पुढे यावे. असे आवाहन डॉ. विखे यांनी केले.
या सहा महिन्यात पीएम योजनेतून ज्या लाभार्थ्याना घरकुल मंजूर झाले आहे. त्या लाभार्थ्याना पाच ब्रास मोफत वाळू पोहोचवण्याचे काम पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी करावे अशा सुचेना त्यांनी दिल्या.
दरम्यान संगमनेर विधानसभा मतदार संघात भोजापूर चारीचे पाणी तळेगाव गटाला मिळत नाही आणि साकुरची जलसिंचन योजना मार्गी लागत नाही, तोपर्यत संगमनेर विधानसभेत सत्कार स्विकारणार नसल्याचे सांगितले. तर, दोन महिन्यांत भोजापूर चारीचे भुमीपुजन करुन पाणी देण्याची ग्वाही यावेळी दिली. लवकरचं आश्वी परिसरातील २६ गावांमध्ये दुध धंदा करणाऱ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना पशुखाद्य बाजारभावापेक्षा अर्ध्या किमतीत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देखील डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.