जांभुळवाडी गावाचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतर - आमदार अमोल खताळ
◻️ अनेक वर्षांपासून रखडलेल्या मागणीला यश
◻️ पालकमंत्री विखे पाटील आणि आमदार खताळ यांचे ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी मानले आभार
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील मौजे जांभुळवाडी व मौजे साकूर या दोन स्वतंत्र ग्रामपंचायत असल्या तरी महसुली सजा एकच असल्याने जांभुळवाडीचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतरण करण्याची नागरिकांची गेल्या अनेक वर्षांची जुनी मागणी होती.
महायुतीच्या कार्यकर्त्यानी याबाबत पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल घेत पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जांभुळवाडी गावाचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतरण केल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. तसेच सदर अधिसुचना अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी प्रसिद्ध केली आहे.
या निर्णयामुळे साकूर या महसुली गावाचे साकूर व जांभुळवाडी या दोन स्वतंत्र महसुली गावांत विभागणी झाली असुन जांभुळवाडी या गावाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळणार आहे. तसेच जांभुळवाडी हद्दीतील साकूर मध्ये समाविष्ट असलेले भुमापन क्रमांक वगळुन नव्याने जांभुळवाडी मध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.
या निर्णयाचे जांभुळवाडी परिसरातुन मोठ्या प्रमाणात स्वागत होत असुन ४० वर्षांचा प्रश्न १०० दिवसांत मार्गी लावण्यात आली भावना व्यक्त होत आहे. त्यामुळे पठारभागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोंडाजी खेमनर, बुवाजी खेमनर, भाजपचे गुलाबराजे भोसले, रऊफ शेख, मच्छिंद्र खेमनर, युवराज खेमनर, नागेश कोळेकर, संतोष खेमनर, मन्सुर पटेल, बाळासाहेब दिनकर खेमनर आदिसह नागरिकांनी पालकमंत्री विखे पाटील, आमदार अमोल खताळ आणि महायुती सरकारचे आभार मानले आहेत.