जनतेने नाकारलेले राजकीय अस्तित्वासाठी पाण्याचे राजकारण करतायत

संगमनेर Live
0
जनतेने नाकारलेले राजकीय अस्तित्वासाठी पाण्याचे राजकारण करतायत

◻️ प्रवरा उजव्या आणि डाव्या कालव्याच्या नूतनीकरणाचा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ 

◻️ शेतकऱ्याना वेठीस धरण्याचा प्रयत्न केल्यास सहन करणार नाही



संगमनेर LIVE (आश्‍वी) | पाणी पुरवठ्यासाठी कार्यान्वित असलेल्या जुन्या ब्रिटीश कालीन योजना सक्षम करण्याचे धोरण विभागाने हाती घेतले असून, लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळाले पाहीजे हीच भूमिका आहे. मात्र, ज्यांना जनतेने नाकारले तेच आता स्वःताचे राजकीय अस्तित्व दाखविण्यासाठी पाण्यासाठी राजकारण करून दांडगाई करीत आहेत. मात्र शेवटच्या भागातील शेतकऱ्याला वेठीस धरण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर, आम्ही सहन करणार नाही असा इशारा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

भंडारदार प्रकल्पांतर्गत असलेल्या प्रवरा उजव्या आणि डाव्या कालव्यावरील वाॅटर कोर्स आणि वितरीकांच्या नूतनीकरणाचा शुभारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक आणि संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथे माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील आणि आण्णासाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांच्यासह सर्व संस्थाचे संचालक आणि लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. यापुर्वी कालव्याच्या कामांना कधीही निधी मिळाला नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने कालव्याचे नूतनीकरण होत असून जुन्या पारंपरिक सिंचन व्यवस्था या माध्यमातून अधिक सक्षम होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, राहुरी या तालुक्यातील उजव्या कालव्यावरील सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्राला तर डाव्या कालव्यावरील २३ हजार हेक्टर क्षेत्र अवलंबून आहे. कालव्यांच्या जीर्ण आवस्थेमुळे ७०० एकर जमीन पाण्यापासून वंचित राहात होती. परंतू आता दोन्ही कालव्या करीता सुमारे वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने व नूतनीकरणामुळे लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याला पाणी मिळेल असा प्रयत्न विभागाचा असल्याचे विखे पाटील म्हणाले.

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प महायुती सरकारने केला आहे. यासाठी पायाभूत सिंचन व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे काम विभागाने हाती घेतले आहे. भंडारदार धरणामध्ये अधिकचे पाणी निर्माण करणे आणि पश्चिम वाहीनी नद्यांचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळविण्यासाठी विभागाने प्रयत्न सुरू केले असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की, निळवंडे धरणाचे काम महायुती सरकारने पूर्ण केले. यंदाच्या आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेवटच्या गावाला पाणी मिळावे म्हणून चांगले नियोजन विभागाने केले. आणखी एखादे आवर्तन होईल असा प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

निळवंडेचे आवर्तन चांगल्या पध्दतीने सुरू असताना आता यामध्ये तालुक्यात अडथळे निर्माण करण्याचे काम होत आहे. सर्व तालुक्यातील शेतकऱ्याना पाणी देण्याची जबाबदारी ही जलसंपदा विभागाची आहे. परंतू आम्हालाच मिळाले पाहीजे आणि दुसऱ्याना नको ही भूमिका योग्य नसल्याचे ठणकावून सांगतानाच, मंत्री विखे पाटील म्हणाले की, ज्यांना जनतेने नाकारले ते आपल्या राजकीय अस्तित्वासाठी दांडगाई करून पाण्यासाठी राजकारण करीत आहे. परंतू तुम्ही या भानगडीत पडू नका राज्यात महायुतीचे सरकार आहे. पाण्याच्या प्रश्नात आम्हाला राजकारण करायचे शेतकऱ्यांना कोणी वेठीस धरत असेल तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा विखे पाटील यांनी आपल्या भाषणात दिला.

दरम्यान याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आण्णासाहेब भोसले, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांची भाषणे झाली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !