पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर देशातील आदर्श राज्यकर्त्या
◻️ त्रिशताब्दी जयंतीनिमित्त माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले अभिवादन
संगमनेर LIVE | अहिल्यानगर जिल्ह्याची सुकन्या असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे देशाच्या सामाजिक, धार्मिक, आणि राजकीय क्षेत्रात मोठे योगदान असून सर्व जाती धर्माच्या जनतेला सोबत घेऊन मोठे कार्य केले. पाण्याचे महत्त्व ओळखून जल व्यवस्थापनामध्ये मोठी क्रांती घडवणाऱ्या अहिल्यादेवी होळकर या देशातील आदर्श राज्यकर्त्या होत्या. असे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
संगमनेर मध्ये आशीर्वाद पतसंस्थेसमोर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब ओहोळ, शंकरराव खेमनर, रणजितसिंह देशमुख, विश्वासराव मुर्तडक, रामहरी कातोरे, अर्चना बालवडे, रामदास धुळगंड, भास्कर शर्माळे, अण्णा राहिंज, इंद्रजीत खेमनर, तुकाराम दातीर, सचिन खेमनर, ॲड. अशोक हजारे, माधव खेमनर, गोविंद खेमनर, ज्ञानेश्वर ढोले, राहुल खेमनर, चांगदेव खेमनर, हौशीराम वाघमोडे, अनिल कांदळकर, अविनाश शिंदे, सुभाष हळनोर, एस. एम. खेमनर, भास्कर खेमनर, अण्णासाहेब कुदनर, दीपक धुळगंड, ज्ञानेश्वर ढोणे, सचिन राहींज, राहुल खेमनर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाच्या राजकारणात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेल्या इतिहासाचे अवलोकन करावे इतका अभिमानास्पद हा इतिहास आहे. भारतामध्ये ज्या महिला राज्यकर्त्या होऊन गेल्या त्यामध्ये आदर्श राज्यकर्त्या म्हणून पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांचा गौरव होतो.
मल्हारराव होळकर यांनी चौंडी येथील मुक्कामामध्ये अहिल्यादेवी यांना हेरले आणि आपली सून केली. खंडेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवींनी अत्यंत आदर्श पणे राज्यकारभार सांभाळला. पाण्याचे महत्व ओळखून गावोगावी विहिरी, बंधारे, बारव निर्माण केले. दक्षिणेत रामेश्वर पासून उत्तरेत केदारनाथ आणि पश्चिमेला सुरटी सोमनाथ पासून आसाम पर्यंत विविध धार्मिक स्थळांवर त्यांनी घाट बांधले. चारीधाम, बारा ज्योतिर्लिंग, कुंभमेळ्याची चार ठिकाणी या ठिकाणी मंदिरे उभारली गावोगावी न्याय देण्याची व्यवस्था उभारली. पोलीस प्रशासन, धर्मशाळा, पानवठे निर्माण केले.
अत्यंत लोकाभिमुख कारभार करताना महिला सक्षमीकरणासाठी सती पद्धत बंद केली. याचबरोबर महिलांना लष्करी शिक्षण दिले. घोंगडीवर बसून कारभार करणाऱ्या अहिल्यादेवी यांनी २८ वर्षे यशस्वीपणे राज्यकारभार सांभाळताना आदर्श पद्धतीने निर्माण केली.
या महापुरुषांच्या जीवनातून प्रत्येकाला प्रेरणा मिळाली पाहिजे यासाठी जयंतीनिमित्त वैचारिक व्याख्यानाचे आयोजन करणार असल्याचे ते म्हणाले.
शंकर पाटील खेमनर म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी समानतेचा मंत्र दिला याच विचारांवर लोकनेते बाळासाहेब थोरात काम करत असून सर्व धर्म समभाव व मानवतेचा विचार त्यांनी कायम जोपासला असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी अविनाश शिंदे, प्रा. गणेश गुंजाळ, अण्णासाहेब जगनर, प्राचार्य के.जी. खेमनर रामदास खेमनर, शेखर सोसे, दिनकर भगत, सुभाष खेमनर, बाळासाहेब गेटे, रुपेश धुळगंड, दादाभाऊ खेमनर यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. शंकरराव खेमनर यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. अशोक हजारे व नामदेव कहांडळ यांनी केले. तर अण्णासाहेब राहिंज यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यादेवी आणि संगमनेरचा मोठा संबंध..
अहिल्यादेवी होळकर यांनी संगमनेर मध्ये ही अनेक मंदिरे आणि बारव निर्माण केली. याच प्रमाणे संगमनेरचे प्रसिद्ध कवी अनंत फंदी यांना त्यांनी राजाश्रय दिला. त्यांच्या समतेचा विचार पुढे नेण्यासाठी त्यांच्यासह सर्व महापुरुषांच्या जयंती निमित्ताने वर्षभरात विविध वैचारिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.