‘विखे - थोरात’ समर्थकामध्ये जोर्वेच्या ग्रामसभेत राडा!
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात समर्थकांचे सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
◻️ ४० वर्षांची सत्ता जनतेने उखडून टाकल्याचा थोरात गटाला राग ; विखे समर्थक गोकुळ दिघेचा पलटवार
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा कारभार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक पाहत आहेत. या दोन नेत्यातील संघर्ष हा सर्वश्रुत असल्याने स्थानिक पातळीवर देखील यांचे पडसाद उमटत असतात. असाचं काहीसा प्रकार नुकत्याच पार पडलेल्या जोर्वे गावातील ग्रामसभेत पहावयास मिळाला. यावेळी चर्चेदरम्यान खटके उडाल्यामुळे राडा आणि हमरीतुमरी झाल्याचे पहावयास मिळाले. याप्रसंगी थोरात समर्थकांनी सत्ताधाऱ्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. तर, ४० वर्षांची सत्ता जनतेने उखडून टाकल्याचा थोरात गटाला राग आल्याचा, पलटवार विखे समर्थक गोकुळ दिघे यांनी केला.
माजी मंत्री थोरात समर्थकांनी म्हटले आहे की, आदिवासीसह विविध विकास कामांचा निधी नेमका कुठे गेला? असे अनेक प्रश्न विचारले असताना विखे समर्थक सत्ताधाऱ्यांना एकाही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांनी ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामसभेत वाद झाला.
पुढे म्हणाले की, जोर्वे गावात गेली अडीच वर्ष सरकारी निधीचा गैरवापर होत असल्याने जाब विचारण्यासाठी गेलो. परंतु, सरपंचाकडे याचे उत्तर नसल्याने सत्ताधाऱ्यांकडून प्रश्न विचारांना विचारणाऱ्यांनाच दम देणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार सुरू केल्याचा आरोप थोरात समर्थकांनी करून विकास कामांच्या गप्पा मारणाराचे घोटाळे बाहेर निघायला सुरुवात झाल्यामुळे ते हमरी-तुमरीवर आल्याचे म्हटले.
यावेळी सुरेश थोरात, सत्यजित थोरात, हर्षल काकड, उपसरपंच बादशहा बोरकर, संजय थोरात, संपत थोरात, मुकेश काकड, राहुल बोरकर, भाऊसाहेब दिघे, बालम भवर, माणिकराव यादव, राजू थोरात, रमेश दिघे, अक्षय दिघे, विठ्ठल काकड, पंढरीनाथ बलसाने, गगन थोरात, डॉ. पवन काकड, अजित थोरात, शुभम दिघे, शांताराम दिघे, अमित थोरात, अण्णासाहेब थोरात, कैलास क्षीरसागर, जीवन काकड, ऋषिकेश थोरात, बाळासाहेब काकड, संदीप यादव, दत्तू नाना काकड, शुभम दिघे आदी थोरात समर्थक उपस्थित होते.
४० वर्षांची सत्ता जनतेने उखडून टाकल्याचा थोरात गटाला राग
यासंदर्भात संगमनेर लाईव्हला प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात गोकुळ दिघे यांनी म्हंटले आहे की, ग्रामसभा शांततेत सुरू होती. मात्र सभेला गालबोट लावण्यासाठी थोरात गटाने जाणिवपुर्वक निरर्थक विषय उपस्थित करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यापुर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून १९७८ सालापासून भाडेतत्वावर ग्रामपंचायतीची २ गुंठे जागा आणि विहीर थोरात नावाच्या व्यक्तीस दिली होती. प्रत्येक तीन वर्षानी करारनाम्याचे नुतनीकरण करून ग्रामपंचायत ठरविल तो कर त्यांच्या वारसांनी भरण्याचे ठरविले होते. मात्र ३९ वर्षाचे थकीत भाडे भरण्याबाबतचा ठराव होवूनही थोरात समर्थक या व्यक्तीने दहशत आणि बळाच्या जोरावर गावाच्या नावावर असेलेली जागा आणि विहीर कोणतेही भाडे न भरता स्व:ताच्या ताब्यात ठेवली.
याबाबत ग्रामसभेत विषय निघाला म्हणूनच थोरात गटाने ग्रामसभेत गोंधळ घालून या सभेला गालबोट लावण्याचा आरोप गोकुळ दिघे यांनी केला आहे. जोर्वे गावामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू असलेली विकास प्रक्रिया थोरात गटाला देखवत नाही. गावातील जनतेने विकास प्रक्रियेवर विश्वास ठेवून तालुक्यातील ४० वर्षांची सत्ता जनतेने उखडून टाकली आहे.
तालुक्यातील जनतेने आता विखे पाटलांचे नेतृत्व स्विकारल्याचा मोठा राग थोरात समर्थकांमध्ये आहे. बेकायदेशिर वाळुचे धंदे व सामाण्य माणसाला शासकीय कार्यालयांमध्ये वेठीस धरण्याचे प्रकार तालुक्यात बंद झाल्यामुळेच हतबल झालेल्या थोरात गटाने आता गावोगावी आपल्या बगलबच्यांमार्फत धाक दडपशाही सुरू केली असल्याचा आरोप दिघे यांनी केला आहे.
दरम्यान ‘विखे - थोरात’ समर्थकामध्ये जोर्वे येथील ग्रामसभेत चागलाचं राडा झाल्याची पंचक्रोशीत चर्चा आहे.