निवृत्तीनाथ महाराज पालखी दिंडीचे अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन
◻️ आमदार अमोल खताळ व अप्पर जिल्हाधिकाऱ्यानी केले पालखीचे स्वागत
संगमनेर LIVE | “ज्ञानोबा माऊली तुकाराम” या गजरात, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि पायी दिंडी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशीच्यानिमित्त १० जून रोजी निघालेल्या या पायी दिंडीचे आज सोमवारी दुपारी नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आगमन झाले.
यावेळी पारेगाव बुद्रुक येथे अश्विननाथ महाराज गडावरती आमदार अमोल खताळ आणि प्रशासनाच्या वतीने शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी भक्तिमय वातावरणात निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.
तालुक्यातील पारेगाव येथील अश्विनाथ गडाच्या पायथ्याशी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आल्यानंतर या पालखीवर पारेगाव ग्रामस्थांच्या वतीने जेसीपीतून पुष्पवृष्टी केली स्वतः आमदार अमोल खताळ यांनी पालखीच्या बैल जोडीचा दोर हातात घेत भक्तीत तल्लीन झाले होते. अश्विनीनाथ गडाच्या पायथ्यापासून ते पारेगाव गावापर्यत आमदार अमोल खताळ यांनी गळ्यात विना घातला होता.
त्यांच्या पत्नी नीलम खताळ या डोईवर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी होऊन पायी चालत विठ्ठल - नामच्या जयजयकारात तल्लीन झाले होते. निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख अँड. सोमनाथ घोटेकर यांचे हस्ते आमदार अमोल खताळ आणि नीलम खताळ यांचा गुलाब पुष्प, श्रीफळ, संत निवृत्ती महाराज प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी देऊन सन्मान करण्यात आला.
या पालखी सोहळ्यात शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी ढोल ताशाच्या तालावर लेझीम नृत्य तसेच टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाचा गजर झाला त्यामुळे पारेगाव नगरीला जणू पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज पालखी पायी दिंडी तील वारकऱ्यांना मागील वर्षी आलेल्या अडचणींमुळे यंदा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जिल्हा नियोजनच्या बैठकीत निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाकडून अडीच कोटींचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आला. या निधीतून वारकऱ्यांसाठी आरोग्य, निवास व अन्य आवश्यक सोयी सुविधा उभ्या करण्यात आल्या पालखी प्रमुखांनीही शासनाच्या या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. “यंदा जिल्हा प्रशासन व शासनाने वारकर्याच्या सेवेसाठी जे प्रयत्न केले, त्यामुळे मनाला आत्मिक समाधान वाटते.” असे आमदार खताळ यावेळी म्हणाले आहेत.