प्रवरा नदीपात्र दूषित करणाऱ्यांवर कारवाई करा!
◻️ भाजपचे गोकुळ दिघे यांचे आमदार अमोल खताळ यांना निवेदन
संगमनेर LIVE | संगमनेर तालुका हा विस्ताराने खूप मोठा आहे. या तालुक्यासाठी वरदान म्हणून प्रवरा नदीकडे बघितले जाते. मात्र, आता याच प्रवरा नदीच्या संवर्धनाची वेळ आली आहे. अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे यांनी आमदार अमोल खताळ यांना दिले.
संगमनेर येथील मोठ्या पुलावरून जाणीवपूर्वक काही लोक या प्रवरानदी पात्रात कापलेल्या कोंबड्यांचे नको असलेले भाग, कापलेल्या जनावरांचे अवशेष व मेलेली जनावरे जाणीवपुर्वक सर्रास फेकत आहेत. त्यामुळे सदर ठिकाणासह परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गधी पसरून जल प्रदूषण होत आहे. यामुळे भविष्यात जवळपासच्या नागरिकांसह प्रवरा नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्यास सुरुवात झाली आहे.
संगमनेर शहरामध्ये कापलेल्या कोंबड्यांचे नको असलेले अवशेष संकलन करण्यासाठी नगरपालिकेची कचरा गाडी प्रत्येक दुकानावर जाते. असे असतानाही काही अपप्रवृत्तीचे लोक जाणीवपूर्वक जीवनदायनी असलेल्या प्रवरामाईत घाण टाकण्याचे पाप वारंवार करत आहेत. या प्रवृत्तीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शहरातील कचरा व घाण गोळा करण्यासाठी अधिक उपाययोजना करण्यात याव्यात व जाणीवपूर्वक असे दुष्कृत्य करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनातून केली.
दरम्यान याप्रसंगी गोकुळ दिघे, सचिन दिघे, हरिष काकड, संपत राक्षे, बाबासाहेब थोरात, विशाल थोरात, प्रमोद दिघे, कृष्णा इंगळे, रवींद्र गाडेकर यांसह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार अमोल खताळ यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी तात्काळ प्रशासनाला कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नगरपालिका प्रशासनाला घाण आणि कचरा गोळा करण्याबाबत सूचना दिल्या असून संगमनेर खुर्द येथील पुलाला संरक्षण जाळी बसवण्याबाबत उपाययोजना करण्यास सांगितले. तर, हा प्रकार रात्रीच्या वेळी घडत असल्याने पोलीसांनी रात्री गस्त वाढवावी आणि असे करताना कोणी आढळल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.