आमदार खताळ यांच्या पुढाकारातून मयत अतुल पवार यांच्या कुटुंबाला १० लाखाची मदत
◻️ नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी आई - वडीलांकडे धनादेश केला सुपुर्द
◻️ मयत रियाज पिंजारी याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीसाठी पाठपुरावा सुरू
संगमनेर LIVE | संगमनेर येथील गटार दुर्घटना प्रकरणातील मयत अतुल रतन पवार या तरुणाच्या आई - वडिलांना आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश घरपोहच केला आहे.
संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोड वर नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटारीचे काम सुरू असताना १० जुलै२०२५ला त्या गटारीच्या चेंबरमधील मैला काढत असताना अतुल रतन पवार या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. त्याचवेळी त्यांनी शासनाच्या वतीने ३० लाख रुपयांची मदत देणार असल्याचे लेखी पत्र दिले होते.
आमदार खताळ यांच्या सूचनेनुसार संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक रामदास कोकरे यांनी तत्काळ कार्यवाही करत आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून १० लाख रुपयांचा मदतीचा धनादेश मयत पवार या कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्त केला. ही मदत मिळाल्याने पवार कुटुंबीयांनी आमदार अमोल खताळ व नगरपरिषद प्रशासनाचे आभार मानले असून, उर्वरित रकमेची सुद्धा लवकरच कार्यवाही पूर्ण करणार असल्याचे मुख्याधिकारी कोकरे यांनी सांगितले.
महायुती सरकार जाहिरात बाजी करणारे नव्हे तर काम करणारे..
संगमनेर शहरातील संजय गांधी नगर मधील मयत अतुल रतन पवार यांच्या कुटुंबियांना ३० लाख रुपयांपैकी पहिल्या टप्प्यातील १० लाख रुपयाचा धनादेश मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या कडून घरपोहच देण्यात आला. उर्वरित रक्कम लवकरच कुटुंबियांना देण्यात येणार आहे. राज्यातील महायुतीचे सरकार हे जाहिरातबाजी करणारे नव्हे तर काम करणारे सरकार असल्याचा टोला या दुर्दैवी घटनेप्रकरणी राजकारण करणाऱ्यांना दिला आहे.
रियाज पिंजारीला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत..
संगमनेर येथील गटार दुर्घटना प्रकरणी मयत झालेल्या अतुल रतन पवार या तरुणाच्या नातेवाईकांना शासनाने ३० लाख रुपये देण्याचे जाहीर केले. मात्र, त्याला वाचवण्यासाठी गेलेला रियाज पिंजारी याचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे शासनाने त्यास मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून द्यावी. अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी आज शुक्रवारी विधानसभेत करत या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले.